सरकार शिक्षण व्यवस्थाच संपवायला निघाले-नाना पटोले

आठव्या शिक्षक साहित्य समेलनाचे उदघाटन


गोंदिया – भारतीय लोकशाहीचा ग्रंथ म्हणजे संविधान आणि त्यातील शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. शिक्षणाने माणूस घडतो मात्र केंद्र व राज्यातील सत्तारुढ सरकार नवीन नवीन धोरण तयार करुन सरकारी शाळा बंद पाडण्याचा कट करीत आहे. शिक्षणाची मुळ पायरी काढून घेवून शिक्षण व्यवस्था संपविण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसच्या अखिल भारतीय किसान संघाचे अध्यक्ष व माजी खा.नाना पटोले यांनी केला आहे.
शिक्षक भारतीतर्फे आठवे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी (२२ डिसेंबर) संमेलनाच्या पहिल्या दिवसाच्या सत्राच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी स्वागताध्यक्ष राजेंद्र झाडे, अशोक बेलसरे, अतुल देशमुख, लोककवी अरुण म्हात्रे, संस्था कार्याध्यक्ष जयवंत पाटील,अमर वराडे,महेंद्र सोनवाने उपस्थित होते.