शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी भक्कमपणे पाठिशी


बल्लारपूर - मूल मतदार संघातील  कोट्यवधीच्या रस्त्यांचे भूमिपूजन 
चंद्रपूर, दि.26 डिसेंबर - समूह शेती,गट शेती, सिंचन क्षमता वृद्धी, दुभत्या जनावरांची उपलब्धता, आधुनिक शेतीचे प्रशिक्षण व जोडधंदा,रोजगाराच्या संधीमार्फत बल्लारपूर -मूल मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात दुप्पट वाढ करायची आहे. त्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल, त्यासाठी शेतकरी बांधवांच्या पाठिशी आपण खंबीरपणे उभे आहोत, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केली. चंद्रपूर जिल्हयातील सुशी येथे आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2022 पूर्वी शेतकऱ्यांच्या उत्पादनात दुप्पट वाढ करण्याचे निश्चित केले आहे. त्यांच्या अभीवचनाची पूर्तता आपल्या मतदारसंघात सर्वात आधी केल्या जाईल. त्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयीसुविधा व सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी घोषणा आज सुशी येथे आयोजित जाहीर सभेत केली. केळझर-सुशी, सुशी-मानकापूर, डाबगाव-सुशी, चिचाळा-चिरोली आदी रस्ते, पुलांचे बांधकाम,रस्त्यांचे रुंदीकरण, डांबरीकरण, मुरुम अस्थरीकरण, खडीकरण, रस्ता दिशा दर्शक फलक लावणे आदी कामांचा आज शुभारंभ करण्यात आला आहे. या सर्व कामांचा भूमिपूजनाकरिता सुशी व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने याठिकाणी सभेला उपस्थित होते.

मुल परिसरामध्ये गेल्या चार वर्षांमध्ये 125 कोटी खर्च करून 104 किलोमीटरचे रस्ते निर्माण होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यासोबतच या परिसरातील शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये बदल व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. चिरोली मध्ये बंधारा होत आहे. चिचडोहमध्ये 500 कोटी खर्च केलेला प्रकल्प पूर्ण होत आहे. मूल परिसरातील 5 हजार शेतकऱ्यांना एकत्रित समूह शेतीचे प्रशिक्षण दिल्या जात आहे. 91 गावांमध्ये मोठया प्रमाणात विकल्या जाते ते वाण पिकवायला शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले जात आहे. पोंभूर्णा मध्ये जोडधंदा म्हणून टूथपिकचा प्रकल्प उभा केला जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात जे. के. ट्रस्ट सोबत करार करण्यात आला असून या माध्यमातून मुल परिसरातील भाकड जनावरांवर उपचार करण्यात येवून दुधाचे उत्पन्न वाढविण्यात येणार आहे. या परिसरात सर्व छोटे-मोठे प्रकल्प आपल्या पूर्ण क्षमतेने सुरू होतील यासाठी प्रयत्न सुरू असून बंद पडलेले प्रकल्प सुरू करण्यात आले आहे. त्या माध्यमातून सिंचन क्षमता वृद्धीला भर दिली जात आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रत्येक योजनांची अंमलबजावणी या मतदारसंघामध्ये होईल, याबाबत आपण जागरूक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बल्लारपूर मतदारसंघ धुरापासून मुक्त करण्यासाठी वेगवेगळ्या योजनेतून गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतींना 10 लक्ष किंमतीचा शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या आरो मशीनची उपलब्धता करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतदार संघातील सर्व अंगणवाडी आयएसओमार्क असतील व देशातील सर्वात सुंदर असे प्रत्येक अंगणवाडीचे स्वरूप असेल, असे सांगितले.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांनी देखील यावेळी संबोधित केले वाघाच्या हल्ल्यापासून, संरक्षणापासून तर सिंचनाच्या उपलब्धतेपर्यंत शेतकऱ्यांच्या बाबत अतिशय जागरूकतेने नामदार मुनगंटीवार यांचे मार्गक्रमण सुरू असून रस्ते, शाळा, आरोग्य, पेजल, सिंचन या बाबतीत प्रत्येक योजना मतदारसंघात कशी सक्षमतेने राबविली जाईल याबाबत त्यांचा आग्रह असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे यांनी केले. त्यांनी गेल्या चार वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या मतदारसंघात करण्यात आलेल्या कामाचा आढावा सादर केला.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, पंचायत समितीच्या सभापती पूजाताई डोहने, मुल नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदू भाऊ रणदिवे, पंचायत समिती सदस्य वर्षाताई लोनबले, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वी अवताडे,राहुल संतोषवार, सुशी गावच्या सरपंच कमलाबाई गोरंतवार, सुनील आयलनवार, विवेक बुरांडे, सिताराम भांडेकर, अजय शेंडे, कल्पना सोयाम, शोभा मांदाडे, प्रियंका कुनघाडकर, भारती राऊत , उपअभियंता श्री.वसुले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन जिल्हा परिषद सदस्य पृथ्वी अवताडे यांनी तर आभार प्रदर्शन विवेक बुरांडे यांनी केले.