स्वच्छ भारत अभियानामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील चार नगरपालिका पहिल्या दहामध्ये

  मुल प्रथम स्थानावर
चंद्रपूर/प्रतिनिधी:
राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री यांचा मतदारसंघ असणाऱ्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील तीनही स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात मुल, बल्लारपूर नगरपालिका व पोंभूर्णा नगरपंचायत तसेच जिल्ह्यातील चिमूर ही नगरपालिका स्वच्छ भारत अभियानातील सुंदर शहराच्या यादीमध्ये पहिल्या दहामध्ये आल्या आहेत. विशेष म्हणजे मूल शहर स्वच्छ भारत अभियानात, स्वच्छता ॲप वापरणारे भारतातील सर्वात सुंदर शहर म्हणून गुणाणुक्रमे पाहिले ठरले आहे.
Image result for स्वच्छ भारत
स्वच्छ भारत अभियानामध्ये स्वच्छता ॲप स्पर्धेमध्ये मुल, पोंभूर्णा, चिमूर व बल्लारपूर या स्थानिक स्वराज्य संस्थांनीही आघाडी घेतली आहे. देशभरात सुरू असलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छता ॲप नागरिकांकडून डाऊनलोड करून घेणे, त्या ॲपवर नागरिकांच्या तक्रारीची नोंदणी करणे, त्या तक्रारीचे निराकरण करणे, नागरिकांना तातडीने प्रतिसाद देणे आदी निकषांवर ही क्रमवारी ठरविण्यात आली आहे.

मुल नगरपालिकेची लोकसंख्या 25 हजार 449आहे. याठिकाणी 4 हजार 2 रजिस्ट्रेशन झाले. आणि जवळपास 100 टक्के या तक्रारीचे निराकरण करण्यात आले आहे. त्यामुळे मूल नगरपालिकेला भारतामध्ये सर्वाधिक प्रतिसाद देणारी नगरपालिका ठरविण्यात आले आहे. मूल हे छोटे शहर चंद्रपूर जिल्ह्यातील अतिशय देखणे शहर असून एखाद्या तालुक्याचे गाव किती सुंदर असावे, अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा या ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत. हे शहर आता ॲप वर प्रतिसाद देणारे भारतातील पहिले ठरले आहे.

पोंभूर्णा ही चंद्रपूर जिल्ह्यातील छोटी नगरपंचायत आहे. या ठिकाणची लोकसंख्या 6870आहे. या ठिकाणच्या 138 तक्रारी आल्या होत्या. याठिकाणी 100% तक्रारीचे निराकरण करण्यात आले आहे. पोंभुर्णा नगरपंचायत भारतात 5 वी आली आहे.चिमूर नगरपालिकेमध्ये लोकसंख्या ही 25 हजार 741 आहे. या ठिकाणी 981 तक्रारी आल्या होत्या.92.39 टक्के तक्रारीचे निराकरण करण्यात आले आहे. चिमूर नगरपालिका भारतातून 8 व्या क्रमांकावर आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका असणाऱ्या बल्लारपूर या शहराची लोकसंख्या एकूण 90 हजार 452 इतकी आहे. औद्योगिक व ऐतिहासिक असणाऱ्या या शहरांमध्ये 4 हजार 697तक्रारी ॲप वर डाऊनलोड करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 91.44 टक्के तक्रारीचे निराकरण करण्यात आले आहे. बल्लारपूर नगरपालिका भारतात 9 व्या क्रमांकावर आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये या नगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियानाचे प्रसिद्धी मोहीम राबविण्यात आली होती. त्याला उत्तम प्रतिसाद नागरिकांनी दिलेला आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या तीनही नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन केले आहे. आपल्या मतदारसंघातील तीनही स्थानिक स्वराज्य संस्था ह्या भारतामध्ये सर्व गटांमध्ये स्वच्छता अभियानात अव्वल राहाव्यात यासाठीचे नियोजन त्यांनी केले आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ह्या स्थानिक स्वराज्य संस्था अनेक गटवारी मध्ये अग्रेसर राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.