जिल्ह्यातील १२ रुग्ण कोरोना आजारातून बरे, ६७नमुने प्रतीक्षेत





जिल्ह्यातील 12 रुग्ण कोरोना आजारातून बरे

Ø सध्या अॅक्टिव रुग्णांची संख्या 10

Ø कंटेनमेंट झोनमध्ये आरोग्य पथकामार्फत सर्वेक्षण

Ø 67 नमुने प्रतीक्षेत

Ø चार हजारांवर नागरिक संस्थात्मक अलगीकरणात

दिनचर्या न्युज :- चंद्रपूर
चंद्रपूर,दि.29 मे: चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 12 रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी आज दिली.

जिल्ह्यामध्ये यापूर्वी 2 मे ( एक रूग्ण ), 13 मे ( एक रुग्ण ) 19 व 20 मे ( 10 रुग्ण ) पॉझिटिव्ह आढळले होते. या एकूण 12 रुग्णांना आत्तापर्यंत जिल्हा प्रशासनाने कोरोना आजारातून बरे झाले असल्याचे जाहीर केले आहे. यातील पहिला रुग्ण नागपूर येथून डिस्चार्ज करण्यात आला होता.तर एका युवतीला दोन दिवसांपूर्वी बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली. आरोग्य विभागाने नव्याने जाहीर केलेल्या आरोग्य सूत्रानुसार 19 व 20 मे रोजी पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांना 10 दिवसानंतर कोणतेही लक्षणे न दिसल्यामुळे या आजारातून बरे झाल्याचे जाहीर करण्यात आले. आता 10 रुग्ण जिल्ह्यात वैद्यकीय वास्तव्यात आहे.

कोविड-19 संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील संशयित व्यक्तींना शोधून त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात व गृह अलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. कंटेनमेंट झोनमध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14 दिवस आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच, आयएलआय, सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे.

जिल्ह्यात एकूण 10 कंटेनमेंट झोन कार्यान्वित असून सदरील झोनमधील रुग्णांचा व इतर सर्व रुग्णांचा नियमित पाठपुरावा सुरू आहे. 10 कंटेनमेंट झोनमध्ये 71 आरोग्य पथकामार्फत 3 हजार 151 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून 12 हजार 69 सर्वेक्षित लोकसंख्या आहे.तर,आयएलआय, सारीचे 9 नमुने घेतले असून सर्वच आयएलआय, सारीच‌े 9 नमुने निगेटिव्ह आले आहेत.

कोविड-19 संक्रमित 22 रुग्णांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातून, जिल्ह्यातून,रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -1,मुंबई-3, ठाणे -2, पुणे-6, यवतमाळ -2, नाशिक -3, कोणत्याही प्रकारचा प्रवासाचा इतिहास नाही किंवा पॉझिटिव्ह रुग्णांचे सहवासीत -5 आहे.

जिल्ह्यातील कोविड-19 ची सर्वसाधारण माहिती पुढील प्रमाणे आहे. एकूण 906 स्वॅब नमुने तपासणी पाठविले होते. यापैकी पॉझिटिव्ह 22 नमुने असून निगेटिव्ह 817 आहे तर 67 नमुने प्रतीक्षेत आहेत.

दिनांक 29 मे रोजी एकूण जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरणात 4 हजार 419 नागरिक आहेत. यापैकी ग्रामस्तरावर 3 हजार 586 नागरिक, तालुकास्तरावर 482 नागरिक तर जिल्हास्तरीय 351 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 71 हजार 914 नागरिक जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत. तसेच,61 हजार 134 नागरिकांची गृह अलगीकरण पूर्ण झाले असून 10 हजार 780 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.