टिल्लूपंप न वापरण्याचा मनपाचा इशारा

टिल्लूपंप न वापरण्याचा मनपाचा इशारा

काही भागात टिल्लूपम्पमुळे पाण्याची टंचाई 

शहरात पाण्याचा मुबलक पुरवठा 

दिनचर्या न्युज / चंद्रपर :- शहरात पाण्याचा मुबलक पुरवठा होत असतांना काही भागात टिल्लूपम्पमुळे पाणीपुरवठ्याची समस्या उद्भवत असल्याचे लक्षात आल्याने यापुढे कोणीही अतिरिक्त पाण्यासाठी टिल्लूपंपचा वापर करतांना आढळल्यास चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात येणार आहे.
शहरातील काही भागात कृत्रिमरीत्या निर्माण झालेली पाणीसमस्या सोडविण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने टिल्लूपंप वापरणाऱ्या इशारा दिला आहे. यानंतरही टिल्लूपंपचा सर्रासपणे वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील काही नागरिक अतिरिक्त पाणी मिळावे म्हणून सर्रासपणे टिल्लूपंपचा वापर करतात त्यामुळे शहरात काही  भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊन बऱ्याच जणांना पुरेसे पाणीच मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठयावर विशेष लक्ष दिले जात आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची बचत करणे गरजेचे आहे. अतिरिक्त पाणी मिळावे म्हणून काही नागरिक टिल्लूपंपचा वापर करतात. नागरीकांनी स्वतःहून पाण्याचा अपव्यय टाळणे अपेक्षित आहे. शेवटी पाणी हे सर्वांनाच मिळायला हवे. पाण्याचा मुबलक पुरवठा असला तरी काही जणांमुळे इतरांना पाणी मिळण्यास त्रास निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुबलक पाणी मिळण्यास चंद्रपूर शहरातील नागरिकांनी यापुढे टिल्लूपंपचा वापर करू नये, असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. 

शहरातील महाकाली वार्ड, भिवापुर वार्ड, मातानगर लालपेठ या भागात अनेक दिवसांपासून पाण्याची पाईप लाईन न बदलल्यामुळे जंगयुक्त पाणी येत असतेे. उन्हाळ्यात या परिसरात अनेकांच्या घरी टिल्लूपंपचा वापर होत असल्याने काही ठिकाणी पाण्याची नळाला धार राहात नाही. मनपाने सर्वांना पाणी पुरवठा व्हावा यासाठी शहरातील काही भागात टिल्लूपंप लावणा-यावर कडक कारवाई करावी अशी मागणी वार्डातील नागरिक करीत आहेत.