जागतिक अपंग दिन विशेष लेख

जुन्नर (पुणे)/आनंद कांबळे:
आज आपण २१ व्या शतकात वावरत आहोत तरीही आपले समज-गैरसमज आहे तिथेच आहेत. सद्याची दुष्काळी परिस्तिथी पाहता मानव कृत्रिमरित्या पाऊस पाडू इच्छित आहे. नवनविन झाडांना कलम करून सुंदर अश्या फुलबागा तयार करू पाहत आहे . परंतु जी फुले आपल्या घरात जन्माला आली आहेत त्यांना योग्य ते खतपाणी न देता ती उमळण्याआधीच कोमजतात यांकडे मात्र दुर्लक्ष करित आहे. साने गुरुजी म्हणत 'मुलं म्हणजे देवाघरची फुलं' म्हणजेच ज्या मुलांना देवाघरी स्थान आहे . त्यांना त्यांच्या स्वत:च्या हक्काच्या घरी मात्र कवडीमोलही किंमत नसावी ही एक खरोखरच एक खंत करण्यासारखी गोष्ट आहे.


दिव्यांग ( मतिमंद असलेली) म्हणजेच विशेष मुले आज किती तरी लोकांच्या घरी जन्माला येतात. काही घरामध्ये त्यांना हक्काचे स्थान मिळतही. परंतु अशी उदाहरणे बोटावर मोजण्याईतकीच.जवळ जवळ निम्म्याहून अधिक मुलांना तर वेडा म्हणूनच संबोधण्यात येते . अहो जर कोणी कुठे आणि कसा जन्म घ्यायचा हे जर आपल्या हाती असते तर सगळे विद्वान पंडित, राजे महारथी म्हणूनच जन्माला नसते का आले ? मानसिक अपंग मुलांनाही स्वतःच्या अशा भावना असतात . त्यांनाही प्रेम , जिव्हाळा , आपुलकी, ओढ हे शब्द कळत नकळत का होईना पण स्पर्ष करून जातात . आपल्याला थंडी वाजली तर आपण आहाहाहा करत कुडकुडायला लागतो . ह्या संवेदना त्यांनाही असतात . फरक केवळ एवढाच असतो की आपण थंडीला प्रतिउत्तर म्हणून गरम चादर अंगावर ओढातो . ही मुले मात्र तशीच गारठत उभी राहतात मग आपल्यातीलच एखाद्यने त्याच्या अंगावर चादर नको का ओढायला..........

काही पालक मानसिक अपंग मुलगा म्हणजे जणू काही शापच समजतात . आणि तो जर शाप असेल तो तुमच्यासाठी , त्यांची शिक्षा त्यांनी का भोगावी. कारण शाप हा तर आपापल्या कर्मामुळे मिळालेला असतो. आणि प्रत्येक शापालाही एक अभिशाप असतोच कि. रामायणातील अहिल्या हि देखील कित्येक वर्ष शापात होती परंतु प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने ती देखील शापमुक्त झाली होती. मग या मुलांसाठी का कोणी राम बनत नाही.
समाजात या मुलांना एक वेगळ्या प्रकारची वागणूक दिली जाते, त्यांच्याकडे आजही एका वेगळ्या नजरेने पहिले जाते. अरे पण तुमच्याकडे देखील कुणाचीतरी नजर असतेच ना. जेव्हा एखादे मतिमंद मूळ बाजारात, लग्नसमारंभात काय अगदी बागेत जरी खेळायला गेले तरी आजूबाजूची लोक त्याला तिरस्कृत नजरेने बघतात परंतु या नजरेची साधी कल्पनादेखील या मुलांना नसते.

समाजात अशीही काही उदाहरणे आढळतात कि खुळा म्हणून या मुलांना हीन दर्जाची वागणूक दिली जाते तर काहींच्या घरी हि मूल अतिशय लाडकी असतात पण ते लाड काय कामाचे जे त्यांचं आतित्वच हिरावून घेतात. मुलगा वागतो तसा वागू दे गप्प बसला म्हणजे झालं, त्यांच्या कामात अडथळा नको म्हणून काही पालक या मुलांना घरातच कोंडून ठेवतात मग ते मूल काय खात, काय पीत, कस राहत यांच्याशी त्यांना काहीही सोयर-सुतक नसत. त्यापेक्षा सर्वात प्रथम या मुलाना समजून घ्या, त्यांच्या कामाची सवय लावा, स्वतःच काम स्वतः करणे हि त्यांची स्वतःची जबाबदारी आहे याची जाणीव मुलाना करून द्या.

मानसिक अपंग, विशेष मुलांसाठी आज विविध सामाजिक संस्था व शाळा काम करत आहेत. येथे या मुलांचे अपंगत्वाचे प्रमाण, बुध्यांकानुसार त्यांचे वर्गीकरण करून विविध गट तयार केले जातात. त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना कामे दिली जातात. या संस्था त्याच्यातील सुप्त गुण शोधून त्यांच्या विविध त्यांच्या कलागुणांच्या विकासासाठी प्रयत्न करतात. हि मुले मेणबत्या, खडू,कापूर, अगरबत्ती बनविणे, चित्रकला, हस्तकला, शिवणकाम करून शोभेच्या वस्तू बनवून त्यांची प्रदर्शनामार्फत विक्री करणे अशी कामे करतात, याशिवाय गायन, नृत्य, अभिनय, नाटक सादरीकरण करतात, मैदानी खेळ, स्पर्धात्मक खेळ, मनोरंजनात्मक खेळ खेळणे अशा इविध उपक्रमात सहभाग घेतात, ज्या मुलांना शारीरिक अपंगत्व आहे त्यांच्या गरजेनुसार फिसिओ थेरपी, स्पीच थेरपी, ऑक्यूपेशनल थेरपी अशा विशेष तज्ज्ञच्या मार्गदरशनखाली दिली जाते. अपंग मुलांमध्ये काम करणे अवघड जरी आले तरी अशक्य मात्र मुळीच नाही हे त्या मुलांमध्ये गेल्याशिवाय आणि त्यांच्या सोबत काम केल्याशिवाय कसे कळणार? म्हणूनच म्हणतोय

अपंगांना हवी आहे तुमची साथ, द्या त्यांना मदतीचा हात,
मग ते हि करतील हसत खेळत अपंगत्वावर मात
जगतीक अपंग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
संस्थेविषयी थोडेसे....
घे पाखरा मार भरारी, नको पाहू फिरुनी माघारी......
जरी अधुरी तुझी कहाणी, परी गात जा मंजुळ गाणी.....

माय ऍक्टीव्हिटी सेन्टर संचलित नंदनवन हि नोंदणीकृत सामाजिक संस्था शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर शहरापासून 3 कि.मी. अंतरावर मतिमंद या दिव्यंग घटकासाठी शिक्षण, पुनर्वसनाचे सेवाकाम गेल्या 5 वर्षांपासून करत आहे. सद्या संस्थेत 22 मतिमंद बांधव संस्थेचा लाभ घेत आहे. सेवाकार्य आपल्यासारख्या दानशूर, सामाजिक भान असलेल्या दात्यांच्या, लोकसहयोगाच्या मदतीतून चालत आहे. त्यांना आपल्या मदतीची गरज आहे, आपणहि आपल्या व्यस्त जीवनशैलीतून थोडासा वेळ काढून आवश्य भेट द्यावी, संपर्कासाठी पत्ता : 
नंदनवन, मु. पो. खानापूर, धामनखेल रोड, ता. जुन्नर, जि. पुणे
लेखक : विकास बाजीराव घोगरे (विशेष शिक्षक)
संस्थापक : माय ऍक्टीव्हिटी सेंटर संचलित नंदनवन, जुन्नर, पुणे
मो. ९९६७२३०१८५, ७९७२४४४०८९