रामाळा तलावाचे खोलीकरण करण्याची इको-प्रो ची मागणी

ऐतीहासिक तलावात साचतेय शहरातील सांडपाणी
दुर्लक्षामुळे ऐतिहासिक जलस्त्रोतच रोगराईचे माध्यम ठरतोय

चंद्रपूर/प्रतीनिधी:
चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलावाचे खोलिकरण व सौदर्यीकरण करण्याची मागणी इको-प्रो चे बंडु धोतरे यांनी जिल्हयातील मंत्री, शासन-प्रशासनाकडे केलेली आहे.शहरातील प्राचीन ऐतिहासिक गोंड़कालीन रामाळा तलावाचे खोलीकरण करून त्याचे सौन्दर्यीकरण करण्याची मागणी एका निवेदनातुन ना. हंसराज अहिर, ना. सुधीरभाऊ मुुनगंटीवार, आमदार नानाजी शामकुळे, जिल्हाधिकारी व आयुक्त, महानगरपालिका यांचेकडे इको-प्रो च्या वतीने करण्यात आलेली आहे.

चंद्रपूर शहराच्या निर्मीतीसोबतच गोंडकालीन ऐतिहासिक रामाळा तलावाचा सुध्दा इतीहास जुळलेला आहे. आजपासुन किमान 500 वर्षापुर्वी चंद्रपूर राज्याची स्थापना बल्लारपुरचे शेवटचे गोंडराजे खांडक्या बल्लाळशहा यांनी केली होती. चंद्रपूर शहरास वेढलेल्या दोन नदयाच्या पुरापासुन या शहराचे संरक्षण व्हावे म्हणुन संपुर्ण शहरास वेढा घातलेला किल्ला-परकोटाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. या परकोटासोबत शहरात पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने ‘रामाळा तलाव’ चे बांधकाम करण्यात आले होते.

रामाळा तलावाचे या शहरात अत्यंत महत्वपुर्ण स्थान आहे. याकरिता या तलावाचे संरक्षण व संवर्धन करण्याची गरज आहे. आज या प्राचीन ऐतिहासिक गोंडकालीन तलाव 400 एकर अशा विस्तीर्ण क्षेत्रापैकी आता फक्त 90 एकर मध्ये शिल्लक राहीलेला आहे. या तलावास जुडुन असलेला ‘लेंडारा’ तलाव सुध्दा अतिक्रमणाखाली गेलेला आहे. अशाचप्रकारे शहरातील घुटकाळा तलाव, गौरी तलाव, तुकुम तलाव ई. काळाच्या ओघात नष्ट झालेले आहेत. याबाबत त्वरीत उपाययोजना न करण्यात आल्यास 'रामाळा तलाव' सुध्दा इतिहास जमा होईल. 

वर्ष 2008 मध्ये रामाळा तलावामध्ये ‘इकाॅर्नीया’ या जलीय वनस्पतीने थैमान मांडले होते. या वनस्पतीमुळे सदर तलाव नष्ट होण्याच्या स्थितीत होता. प्रदुषणाची समस्या सुध्दा निर्माण झालेली होती. त्यावेळेस इको-प्रो च्या सततच्या पुढाकाराने तसेच प्रयत्नातुन रामाळा तलाव स्वच्छता अभियानाची सुरूवात करण्यात आली होती. या अभियानास प्रशासनाची योग्य मदत मिळाल्याने आणि विवीध संस्था-संघटना यांच्या श्रमदानातुन रामाळा तलाव स्वच्छ करण्यात आलेला होता. या तलावाचे पुर्ण पाणी सोडण्यात आल्यानंतर तलाव सुकवुन 'इकाॅर्नीया' ही वनस्पती पुर्णपणे काढण्यात आली होती. मात्र यावेळेस वेळ आणि निधीची कमतरता यामुळे रामाळा तलावाचे खोलीकरण करण्याची मागणी असताना सुद्धा, करणे शक्य झाले नाही.
सदर ‘रामाळा तलाव स्वच्छता अभियान’ राबविताना काही बाबी, समस्या प्रामुख्याने लक्षात आलेल्या होत्या त्या आजही कायम असुन यात आणखिनच भर पडली आहे. 

1. रामाळा तलाव शहरातील सर्वात मोठे सांडपाणी जमा होण्याचे केेंद्र झाले आहे.

2. शहरातील मुख्य मच्छीनाल्याच्या एक भाग जो झरपट नदीस मिळतो तो सरळ तलावात येतो. 

3. यामुळे तलावातील जमा होणाऱ्या या घाण पाण्यावर जगणारी अनेक जलीय वनस्पती वाढत असते.

4. सोबत तलावानजीक राहणाऱ्या नागरीकांना या पाण्याच्या दुर्गधी आणी आजांराचा सामना करावा लागतो. मागील अनेक दिवसापासुन या दुर्गधीची तिव्रता अधिक झालेली दिसुन येते.

5. यावर ‘वाॅटर ट्रिटमेंट प्लाॅन्ट’ बसविण्याची गरज असतांना अदयापही व्यवस्था करण्यात आलेली नाही.

6. लगतच्या स्थानीक नागरीकांचे सांडपाणी सुध्दा सरळ तलावात जात असते. वस्तीतील सांडपाणी वाहुन जाणारी व्यवस्था योग्य करण्याची गरज आहे.

7. लगतच्या रेल्वे मालधक्कावरून रासायनीक खते चढ-उतार होत असल्याने जमीनीवर पडणारे युरीया, सल्फेट सारखी खते पावसाच्या पाण्यासोबत वाहुन तलावात येत असतात.

8. तलावाच्या पच्छिम दिशेस अतिक्रमणाची समस्या कायम असुन त्या बाजुस संरक्षण भिंतीचे बांधकाम अदयापही झालेले नाही.

9. गेल्या शेकडो वर्षातील वाहुन आलेला गाळ, आणि लोकवस्ती झाल्यानंतर नाल्यातुन सांडपाणी सोबतचा नालीचा गाळ 500 वर्षात कधीच काढण्यात आलेला नाही.

10. सातत्याने दरवर्षी होणारे गणेश व दुर्गा मुर्ती विसर्जन यामुळे जमा होणारी माती याचा थर वाढतच चालला आहे.

11. खोलीकरणानंतर पावसाचे पाण्याने तलाव भरणे शक्य नसल्यास वेकोली चे सातत्याने भुगर्भातील फेकण्यात येत असलेले पाणी तलावाकडे वळविणे सहज शक्य आहे.

12. ‘स्वच्छ भारत अभियानास’ साथ म्हणुन ‘स्वच्छ चंद्रपूर-सुंदर चंद्रपूर’ करीता या तलावाचे खोलीकरण अगत्याचे झालेले आहे.
वरील सर्व समस्या सोडविण्याच्या दृष्टीने, आपला गोंडकालीन ऐतिहासिक वारसा संरक्षणाच्या दृष्टीने तसेच शहरातील अत्यंत महत्वाचे विस्तीर्ण असे जलस्त्रोत कायमस्वरूपी संवर्धन करण्याच्या दृष्टीने व्यापकपणे कार्य करण्याची गरज आहे. तसेच या रामाळा तलावाचे सोदर्यीकरण करून पर्यटन दृष्टया विकसीत करण्याची इको-प्रोची मागणी आहे. त्यासंदर्भात लगेच पावले उचलुन सदर प्रस्ताव संबधीत विभागाकडे पाठवुन मंजुर करून घेण्याची विनंती इको-प्रो ने शासन-प्रशासनाकडे केलेली आहे. सध्या योग्य वेळ असल्याने लगेच तलावाचे पाणी सोडुन तलाव लवकर सुकविण्यात आल्यास जानेवारी-फेब्रुवारी पासुन खोलीकरणाच्या कामास सुरूवात होऊ शकते असे मत इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी व्यक्त केले आहे.