चंद्रपुरात रेशीम कोष खरेदी केंद्राला मान्यता

चंद्रपूर/प्रतिनिधी: 

 विदर्भ व लगतच्या विभागातील तुती व टसर कोषाचे उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांना, खरेदीदारांना, रिलर्स तसेच उद्योजकांना टसर कोषाच्या खरेदीविक्रीची सुलभतेने सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी चंद्रपूर येथे रेशीम कोष खरेदी केंद्राची स्थापना करण्यात यावी, असे पत्र केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच संचालक रेशीम संचालनालयास पाठविले होते. या संदर्भातील पाठपुराव्याची तसेच या अनुषंगाने उपलब्ध अनुकूल सुविधांची योग्य दखल घेत विभागीय रेशीम कार्यालय, नागपूर यांच्याद्वारा या केंद्राला तत्वत: मान्यता प्रदान करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर येथील यार्डवर हे केंद्र भाडेतत्वावर जागा घेवून सुरू करण्याससुध्दा अनुमती देण्यात आली आहे. 

केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या पत्राची याद्वारे त्यांनी केलेल्या मागणीची गांभीर्याने दखल घेत विभागीय रेशीम कार्यालय, नागपूर यांनी चंद्रपुरात रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी सर्व शक्याशक्यतेबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना पाथरी येथील रेशीम विकास अधिकारी श्रेणी-१ यांना केली होती. त्यानुसार सदर अहवाल प्रस्तुत केल्यानंतर विभागीय रेशीम कार्यालयाने ही मान्यता प्रदान केली आहे.

मुख्यमंत्री व संबंधित अधिकाºयांना पाठविलेल्या पत्राद्वारे गृह राज्यमंत्री अहीर यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधताना बेंगलोर जवळील रामनगरच्या धर्तीवर विदर्भ व लगतच्या रेशीम उत्पादक शेतकºयांसाठी खरेदी विक्रीची, वाहतूक, विपणन व अन्य सुविधांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथे खरेदी केंद्र उघडण्यास शेतकºयांना व या प्रक्रियेत सहभागी असणाºया सर्वांना मोठी सोय उपलब्ध होईल, याकडे लक्ष वेधले होते.

रेशीम कोष खरेदी केंद्राच्या अभावामुळे राज्यांतर्गत खरेदीपेक्षा राज्याबाहेर मोठया प्रमाणात म्हणजेच ९९.४० टक्के रेशीम कोषाची खरेदी होत असल्याच्या बाबींकडेही त्यांनी या पत्रातून शासनाचे लक्ष वेधले होते. एवढेच नव्हे तर राज्यातील ११ टक्के टसर उत्पादक शेतकरी आपला माल बंगलोर येथे विकत असल्याने त्यांना आर्थिकदृष्टया नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे.

ही बाब मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकºयांनी निदर्शनास आणीत यापूर्वी चार बोगी असल्याने सुविधा व्हायची. आता केवळ एक बोगी उपलब्ध असल्यामुळे बंगलोर येथे मालाची वाहतूक करताना प्रचंड मन:स्ताप होतो. तसेच खासगी वाहनाद्वारे हा माल खरेदी केंद्रावर नेण्यासाठी आर्थिक, मानसिक त्रासाबरोरच मालाच्या दर्जावरही परिणाम होत असल्याच्या संबंधितांच्या तक्रारीकडेही ना. अहीर यांनी लक्ष वेधले होते.

ना. अहीर यांच्या या भूमिकेची योग्य दखल घेत राज्य शासनाच्या निर्देशानुसार रेशीम संचालनालयाने सर्व बाबींची अनुकूलता विचारात घेत विभागीय रेशीम कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांच्या स्वाक्षरीचे पत्र २५ जानेवारीला निर्गमित करून जिल्हा रेशीम कार्यालयाच्या (पाथरी, जि. चंद्रपूर) सकारात्मक अहवालानुसार कृष उत्पन्न बाजार समिती, चंद्रपूर येथे कोष खरेदी केंद्राकरिता लागणारी जागा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १०० स्क्वे. फूट जागा भाडे पट्टीवर घेण्यास तत्वत: मान्यता प्रदान केली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील तसेच वैदर्भीय तुती उत्पादक शेतकºयांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे सहकार्य व सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.

चंद्रपूर हे विदर्भातील मध्यवर्ती ठिकाण असून भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, नागपूर व मराठवाडा परिसर चंद्रपूरशी रेल्वेद्वारे जोडला गेला आहे. त्यामुळे परिवहनाच्या दृष्टीने सर्वात स्वस्त पर्याय चंद्रपूरमुळे निर्माण झाला आहे.