मागण्या मंजूरीनंतरच भरला कारंजाचा आठवडी बाजार

उमेश तिवारी:कारंजा (घाडगे)वर्धा:

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आठवडी बाजारात दुकानदारांना बसण्यासाठी पुरेशी जागा मिळवून देणे व बाजार परीसर स्वच्छ सुंदर व सुव्यवस्थीत राखण्यासाठी कारंजा नगरपंचायत प्रशासनाने कामे सुरू केली असता आज आठवडी बाजाराच्या दिवशी दुकानदारांनी अचानकपणे आपल्या मागण्या साठी काही काळ बाजारपेठ बंद करण्याचा प्रयत्न केला.
दुकानदारांच्या मागण्या मंजूर करीत असल्याच्या आश्वासनानंतरच बाजार भरविण्यात आला. भाजीपालामालाचे व दुकानदाराचे कोणतेही नुकसान होऊ नये व परिस्थिती हाता बाहेर जाऊ नये म्हणून सुरवातीलाच सकाळी नगरपंचायतचे पदाधिकारी उपाध्यक्ष नितीन दर्यापूरकर , शिक्षण सभापती प्रेम महिले ,माजी उपसरपंच उमेश चाफले यांचेसह मुख्य कार्यपालन अधिकारी पल्लवी राऊत यांनी दुकानदारासोबत चर्चा करून योग्य तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू केली असता दुकानदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही.

 त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत आठवडी बाजार भरण्यासाठी अडथळे येत गेले. ४ जानेवारी पासून स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत विविध कामे कारंजा शहरात सुरू आहे त्याच दृष्टीने आठवडी बाजारात सुद्धा स्वच्छता व शिस्त राखावी म्हणून प्रशासनाने काही चांगली कामे करण्याचा सपाटा लावला होता त्या अंतर्गत शनिवारी बाजारात सपाटीकरण करण्यात आले. सदर कामे करीत असतांना रविवारी बाजारात अडथळा येणार नाही याची दक्षता घेण्याची माहिती सुध्दा काही नागरीकांनी प्रशासनाला दिली होती.

आज आठवडी बाजाराच्या दिवशी बाजारात आलेल्या दुकानदारांना सपाटीकरणात ओटेच नसल्याचे दिसून आले.दुकाने मांडताना प्रशासनाची भूमिका मान्य नसल्यामुळे दुकानदारांनी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि या बाबीमुळे तात्पुरती तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली त्यातूनच प्रशासनाने योग्य तोडगा काढण्याच्या दृष्टीने दुकानदारा सह चर्चा केली व त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या. दुकानदार आपल्या पूर्ववत जागेवरच बसतील ,सपाटी करणात तोडण्यात आलेले मातीचे ओटे ८ दिवसात तयार करून देण्यात येईल, या मुख्य मागणी सह इतरही मागण्या मान्य करण्यात येत असल्याचे नगरपंचायतच्या मुख्यकार्यकारी अधीकारी पल्लवी राऊत यांनी उपस्थिता समोर सांगितले.

यावेळी दुकानदाराच्या वतीने माजी सभापती मोरेश्वर भांगे, माजी सरपंच शिरीष भांगे माजी सरपंच शांताराम ढबाले, नगरसेवक संजय कदम, नगरसेवक शेख निसार, किशोर भांगे, काकडे सर व इतरही नागरिक उपस्थित होते. पोलीस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी मैराळे यांच्या सह पोलिसांनी सहकार्य केले.स्वच्छ शहर सुंदर शहर करण्यासाठी प्रशासन चांगले काम करीत असल्याची चर्चा उपस्थित नागरीक करीत होते.परंतु बाजार सुव्यवस्थीत करण्याची शनिवारची वेळ योग्य नव्हती असा सूर उमटत असल्याचे दिसून येत होते.