बौद्ध विहार हे ज्ञानाचे केंद्र व्हावे

अड. महेंद्र गोस्वामी यांचे प्रतिपादन

पवनी- धम्मशिल बुद्ध विहार जामगांव येथे बौद्ध विहाराचा वर्धापनदिन सोहळा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला आयोजित करण्यात आला होता. 

या वर्धापनदिन सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी माजी न्यायाधीश अॅड महेंद्र गोस्वामी हे होते. तर प्रमुख उपस्थितीत अरूण गोंडाने, सुरेश मोटघरे, प्रा. विनोद मेश्राम, लिमचंद बौद्ध, निरूता मोटघरे, बाळबुधे गुरूजी, ऊरकुडे गुरूजी, मनोहर मेश्राम, सुनील उपरीकर सह भदंत नागसेन महाथेरो हे होते. 

द्वितीय सत्राच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना माजी न्यायाधीश अॅड.महेंद्र गोस्वामी यांनी बौद्ध विहार हे ज्ञानाचे केंद्र व्हावे, असे प्रतिपादन केले. तसेच भगवान गौतम बुद्धाने मानवतावादी धम्म दिला .असे सांगून धम्म ही जीवन प्रणाली आहे ,त्यामुळे माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी द्यावी. असे आवाहन केले. 

यावेळी माजी न्यायाधीश अॅड महेंद्र गोस्वामी यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर लिखित महान ग्रंथ "भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म " बौद्ध विहाराला दान दिला.

या कार्यक्रमाचे दरम्यान जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांनी "भ्रूण हत्या करू नका, बेटी बचाव"असा संदेश देणारी नाटिका सादर केली. 

या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सुरेंद्र मोटघरे यांनी केले तर प्रास्ताविक चव्हाण यांनी केले. 

सकाळच्या प्रथम सत्रात भदंत नागसेन यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले व धम्म रॅली काढण्यात आली होती. तर तृतीय सत्रात कराडे गुरूजी यांच्या संगीतमय प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला. 

यावेळी मूर्ती दानदाते खोब्रागडे यांच्या सह मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपस्थित होते.