भास्कर लोंढे यांना ‘चौथास्तंभ’ विशेष पत्रकारिता पुरस्कार 

नागपूर/प्रतिनिधी: 

दैनिक लोकशाही वार्ताचे संपादक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) भास्कर लोंढे यांना निर्मिती, व्यवस्थापन व संपादन गटातून अप्रतिम चौथास्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्कार-२०१९ जाहीर झाला आहे.

युनिसेफ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभाग व अप्रतिम मीडिया फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त राष्ट्र संघटनेने जाहीर केलेले ‘शाश्वत विकासाचे ध्येय आणि प्रसारमाध्यमांचे कार्य’ या विषयावर आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेप्रसंगी हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. यावेळी पर्यावरण ते राजकारण अशा विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांनाही गौरविण्यात येणार असल्याची माहिती अप्रतिम मीडियाचे संचालक डॉ. अनिल फळे यांनी प्रसिद्धी दिली आहे.

भास्कर लोंढे हे ३५ वर्षांपासून पत्रकारिता, जनसंपर्क , कार्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी ‘जनसंवाद विद्या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली आहे.

त्यांनी पत्रकारितेची सुरुवात वर्धा जिल्ह्यातून एक ग्रामीण वार्ताहर म्हणून केली. दैनिक नागपूर पत्रिका, लोकसत्ता, सामना, जनवाद, व देशोन्नती इत्यादी वर्तमानपत्रात वार्ताहर, जिल्हा प्रतिनिधी, उपसंपादक, वरिष्ठ वार्ताहर, ग्रामीण विभाग प्रमुख, सहाय्यक संपादक इत्यादी पदे त्यांनी भूषविली आहेत. यासोबतच जनसंपर्क व माध्यम सल्लागार म्हणून त्यांनी कार्य केले आहे. तर कार्पोरेट क्षेत्रात लॉयड स्टील आणि उत्तम गल्वा स्टील या कंपन्यांमध्ये प्रेसिडेंट कार्पोरेट अफेअर्स पदावर कार्य केले असून सध्या ते दैनिक लोकशाही वार्ताचे संपादक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. उत्तम प्रशासक, कुशल नेतृत्वगुण व पत्रकारितेच्या क्षेत्रातील यशस्वी वाटचालीकरिता त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

भास्कर लोंढे यांच्यासह निर्मिती, व्यवस्थापन व संपादन गटातून सूचेता फुले, दुबई ( कॉर्पोरेट ट्रेनर, मेंटॉर फिल्म मेकिंग, प्रोड्युसर, संपादिका इ-चित्रवेध) यांनाही गौरविण्यात येणार आहे. बिट जर्नालिझम गटातून ग्रामविकास - प्रबोध देशपांडे, अकोला (लोकसत्ता), शुभ वर्तमान - संदिप शिंदे, माढा, जि. सोलापूर (दिव्य मराठी), शैक्षणिक - वेदांत नेब, मुंबई (एबीपी माझा) व जालिंदर नन्नावरे, शिरुर-कासार, जि. बीड (दैनिक पुढारी), सामाजिक - प्रियंका बोबडे-धारवाले, नवी मुंबई (गाव माझा, यु ट्यूब चॅनेल), संतोष भोसले, गेवराई, जि. बीड (दैनिक सामना), दिलीप पोहनेरकर, जालना (इटीव्ही भारत), रमेश भोसले, औरंगाबाद (लोकमत), मनिषा इंगळे, अहमदनगर (रेडिओ), सहकार - अशोक तुपे, श्रीरामपूर (लोकसत्ता), पर्यावरण - सुमेद शाह, पापरी, जि. सोलापूर ( दैनिक दिव्य मराठी), पर्यटन - चंद्रकांत तारू, पैठण, जि. औरंगाबाद ( दैनिक सकाळ), गुन्हेगारी वार्ता - नितीन मोरे, औरंगाबाद (मुक्त पत्रकार), स्वप्निल शिंदे, आसनगांव, ता. कोरेगांव, सातारा ( लोकमत), रमेश लांजेवार, नागपूर (मुक्त पत्रकार), स्थानिक स्वराज्य संस्था - संतोष देशमुख, औरंगाबाद (दिव्य मराठी), स्थानिक राजकारण - सोहेल कादरी, सिल्लोड (आदर्श गांवकरी) यांना पुरस्कृत करण्यात येणार आहे.तर छायांकन गटातून शाम पलाये (छायाचित्रकार औरंगाबाद) यांना सन्मानित करण्यात येईल.

ग्रामीण वार्तांकन गटातून शामकुमार पुरे, सिल्लोड (दैनिक लोकमत), सूर्यकांत भिसे, सिद्धेश्वर गिरी, सोनपेठ, जि. लातूर यांना विशेषांक प्रकाशन गटातून सूरज लोकारे व श्वेता जोशी, पुणे (माय पेपर), प्रभाकर भोसले, पुणे (थिंक पॉझिटिव्ह), राम शेवडीकर, नांदेड ( उद्याचा मराठवाडा) यांना गौरविण्यात येणार आहे. सोशल मीडिया विशेष - अविशांत कुमकर, बीड, फ्रिलान्स बिझनेस जर्नालिझम - अभिजीत हिरप, औरंगाबाद ( क्रीएटिव्ह हब) यांना तर उत्तेजनार्थ मीडिया एज्युकेशन गटांतर्गत शुभम पेडामकर, मुंबई यांना जाहीर झाला आहे.


राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन
वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचे पत्रकार अहोरात्र विकास समस्यांचा पाठपुरावा करत असतात. संयुक्त राष्ट्र संघटनेने ठरविलेली शाश्वत विकासाची ध्येये व उदिष्ट्ये लक्षात घेऊन सर्व माध्यम प्रकारातील पत्रकारांकडून कोणत्या अपेक्षा आहेत? तसेच केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून राबविले जाणारे धोरण व अंमलबजावणी या व इतर बाबींची वस्तुनिष्ठ चर्चा लवकरच आयोजित करण्यात येणार्या  ‘शाश्वत विकासाचे ध्येय आणि प्रसारमाध्यमांचे कार्य’ या विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळेत होणार आहे. अनेक प्रकारच्या संस्था शाश्वत विकास कार्यामध्ये योगदान देतात. त्यापैकी काही संस्थांचे पदाधिकारी, विकास तज्ज्ञांबरोबर खुली चर्चा होईल. सावित्रीबाई फुले एकात्म महिला समाज मंडळ, दिलासा जनविकास प्रतिष्ठान, इकोलॉजिकल फाऊं डेशन, रामकृष्ण मिशन, भारत विकास ग्रूप व इतर काही संस्थांचा सहभाग असणार आहे. ही कार्यशाळा ग्रामीण-शहरी वार्ताहरांपासून ते संपादकपदापर्यंतचे पत्रकार, विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी पत्रकार, सिटिझन जर्नलिस्ट तसेच नागरिकाकांसाठी आयोजित करण्यात आली आहे.