चंद्रपूरात महिला व मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी घेणार ‘पोलीस सारथी’

चंद्रपूर पोलिसांनी घेतली महिला व मुलींच्या सुरक्षिततेची जबाबदारी 
कॉल on चंद्रपूर पोलीस
ललित लांजेवार/९१७५९३७९२५:

दिवसेंदिवस व्हीआयपी संस्कृती कमी होण्याऐवजी वाढतच आहे. पोलीस सामान्य माणसांच्या सुरक्षेसाठी नसून व्हीआयपी (अतिमहत्त्वाच्या व्यक्तीं)च्या बंदोबस्तातच गुंतलेले असतात,असा सर्वसामान्याचा नेहमीचाच गैरसमज असतो.मात्र पोलीस खात्यात जातानाच पोलिसांना "सदरक्षणाय खलनिग्रहणाय"शपथ घेऊन जावे लागते आणि याच घेतलेल्या शपथेमुळे पोलिसांच्या जीवावर संपूर्ण जनता रात्रभर आरामात झोपते.अश्यातच महिलांच्या व मुलींच्या सुरक्षेकडे देखील पोलिसांना मुख्यत्वे लक्ष द्यावे लागते.घ्याच मुद्याला केंद्रित करत चंद्रपूर पोलिसांनी ‘पोलीस सारथी’म्हणून मदत केंद्र सुरु केले आहे.


“पोलीस सारथी” (आम्ही घेतो महिला व मुलींची काळजी) या मदत हेल्प लाईनचा शुभारंभ २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे उपस्थितीत करण्यात आला.
"पोलीस सारथी "या संकल्पनेच्या मागचा उद्देश म्हणजे महिला व मुलींची काळजी घेणे हा होय, यात विशेष करून रात्री १० वाजेपासून तर सकाळी ५ वाजेपर्यंत संकटात सापडलेले महिला व मुलींना मदत करणे हा होय या कालावधीत मदत पाहिजे असल्यास किंवा घरी जाण्यासाठी अडचण येत असेल तर पोलीस नियत्रंण कक्ष संपर्क साधून महिला मदत मागू शकतात. यासाठी चंद्रपूर पोलिसांच्या 07172-251200, 263100, 273258, महिला हेल्पलाईन 1091,व्हॉट्सअप कमांक 9404872100 यावर संपर्क करून मदत देखील मागू शकता,यात महिलांची व मुलींची विशेष काळजी करून त्यांना घरी देखील सोडण्यात येण्याची सुविधा चंद्रपूर पोलिसांकडून करण्यात आली आहे.

एकीकडे महिलांना रात्रपाळी देण्याबाबत सरकारचा विचार सुरू आहे. मात्र त्यासाठीची आवश्यक ती सुरक्षितता महिलांना मिळणे बंधनकारक आहे. खरी गोची अशी आहे की, दिवसासुद्धा महिला निर्भयपणे वावरू शकत नाहीत, तेथे रात्रपाळीचे काम त्यांना देण्याचा प्रयोग यशस्वी होईल का? मोठ मोठ्या शहरात परराज्यातील हजारो तरुणी काम करतात. काम संपवून घरी जाताना आपण सुरक्षितपणे घरी जाऊ का याची टांगती तलवार घेऊनच तरुणी आणि महिला वावरतात. कारण कामच्या ठींकानाहुन घरी परतताना भररस्त्यावरून तरुणींना उचलून नेऊन त्यांच्यावर बलात्कार करण्याचे प्रयत्न झाले आहेत. अनेक महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे लोण केवळ एका शहरापुरते राहिले नाही तर ते राज्यात सर्वत्र पसरले आहे. दुसरीकडे तंत्रज्ञान जितके प्रगत होत चालले आहे तितके ते महिलांसाठी तापदायक होऊ लागले आहे. त्यांना अश्लील संदेश पाठविणे, रात्री अपरात्री फोन करणे, फोटो पाठविणे व वेगवेगळे व्हीडिओ व्हायरल करणे या सर्व प्रकारच्या महिला शिकार ठरत आहेत. अश्यातच हाच विचार करून चंद्रपूर पोलिसांनी आपले शहर सुरक्षित कसे ठेवता येईल यासाठी केलेला प्रयत्नच याला म्हणावा लागले.

गुन्हेगारीला रोखणे, व गुन्हे नियंत्रित करणे आणि घडलेल्या गुन्हांचा शोध लावणे, योग्य तपास करणे, न्यायालयात सादर करण्यासाठी फिर्यादीला , प्रामाणिक आणि पुराव्यांवर आधारित केसेस तयार करून देणे. एकंदरीत समाजामध्ये ,कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीसांवर असते. त्यासाठी त्या त्या ठिकाणी, समाजात घडणार्‍या घटनांविषयीची माहिती ते जमा करणे,अशी पोलीसांची अनेक कर्तव्ये आहेत.मात्र पोलीस सारथीच्या माध्यमातून व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एक प्रसंशानीय काम चंद्रपूर पोलीस करणार आहेत.त्यामुळे आता चंद्रपुरात महिलांना सुरक्षा मिळणार असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही वर्षांपासून कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षा हे मुद्दे नेहमी चर्चेत राहिले आहेत. कामाच्या निमित्ताने रात्री घराबाहेर पडणाऱ्या महिलांसाठी कोणते शहर अधिक सुरक्षित आहे, याबाबत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) चार महानगरांचा अभ्यास केला असून त्यानुसार महिलांसाठी रात्रीची मुंबई सर्वाधिक सुरक्षित असल्याचा निष्कर्ष काढला आहे. रात्री ९ वाजल्यानंतर दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, मुंबई या चार महानगरांत दिल्ली सर्वाधिक असुरक्षित असल्याचा निष्कर्ष नोंदवला आहे.
या आधारे निष्कर्ष - ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१६ या कालावधीमध्ये चार शहरांतील २० हजार ५९७ लोकांची मते घेतली. या मतांचा अभ्यास केल्यानंतर निष्कर्ष काढण्यात आला. त्यानुसार दिल्लीत केवळ १ टक्के लोकच महिलांच्या सुरक्षेविषयी निश्चिंत असतात. बंगळुरूत २१ टक्के, मुंबईत १६ आणि चेन्नईत ५ टक्के लोक महिलांच्या सुरक्षेविषयी निश्चिंत असल्याचे अभ्यासात दिसून आले. रात्री ९ नंतर घराबाहेर असणाऱ्या किंवा कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत अभ्यास केला असता दिल्लीतील ८७ टक्के महिलांचे कुटुंबीय चिंतेत असतात. बंगळुरूत रात्री घराबाहेर असणाऱ्या महिलांविषयी ५४ टक्के लोकांना भीती वाटते, चेन्नईत ४८ टक्के आणि मुंबईत ३० टक्के लोकांच्या मनात भीती असल्याचे दिसून आले.
यावरून रात्री एकटे घराबाहेर पडणाऱ्या महिलांसाठी मुंबई हे इतर महानगरांच्या तुलनेत अधिक सुरक्षित असल्याचे दिसून येते. रात्री ११ नंतर दिल्लीतील ९५ टक्के लोकांना घराबाहेर गेलेल्या महिलांविषयी चिंता वाटते. बंगळुरूतील ८४ टक्के, चेन्नईत ८३ टक्के लोकांना घराबाहेर असलेल्या महिलांविषयी चिंता वाटते. तर मुंबईतील ६० टक्के लोकांना ही भीती वाटत असते.
उपनगरी गाड्या, बेस्ट बस, टॅक्सी-रिक्षासारख्या साधनांमधून मुंबईत मध्यरात्रीही महिला एकट्या प्रवास करताना आढळतात. त्यामुळे मुंबई हे महिलांसाठी सुरक्षित शहर असल्याची चर्चा नेहमीच होते. आता एका सर्वेक्षणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महिलांनी मुंबईला आपली पसंती दिली आहे.