रमाई आवास योजनेसाठी चंद्रपूर जिल्हयाचे उद्दीष्ट आता 7000

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित
 चंद्रपूर, दि.8 फेब्रुवारी – राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री  तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने अनुसूचीत जाती व नवबौध्द घटकांसाठी राबविण्यात येणा-या रमाई आवास घरकुल योजनेसाठी (ग्रामीण) चंद्रपूर जिल्हयाचे एकूण उद्दीष्ट आता 7 हजार इतके झाले आहे. यापूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळाच्या तुलनेत सदर योजनेसाठी चंद्रपूर जिल्हयाच्या एकूण उद्दीष्टात या सरकारच्या काळात तिप्पट वाढ झाली आहे.
            शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय्य विभागातर्फे 8फेब्रुवारी 2019 रोजी याबाबतचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. सन 2018-19 या वर्षाकरीता चंद्रपूर जिल्हयासाठी सदर योजनेकरीता 4500 इतके मंजूर उद्दीष्ट होते. त्यात आता 2500 इतके अतिरीक्त उद्दीष्ट मंजूर करण्यात आले आहे. आता चंद्रपूर जिल्हयाचे एकूण उद्दीष्ट 7 हजार इतके झाले आहे.
            जानेवारी 2019 मध्ये वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत रमाई आवास घरकुल योजना (ग्रामीण) साठी लाभार्थ्यांची मागणी लक्षात घेता मंजूर उद्दीष्ट अपूरे पडत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली होती. त्यानुसार त्यांनी संबंधित विभागाला अतिरिक्त उद्दीष्ट मंजूर करण्यासाठी निर्देश दिले होते. त्यानुसार आता चंद्रपूर जिल्हयाच्या एकूण उद्दीष्टात 2500 ने वाढ झाली आहे.
            याआधी 2010-11 मध्ये 512, सन 2011-12 मध्ये 950, सन 2012-13 मध्ये 370, सन 2013-14 मध्ये 220, सन 2014-15मध्ये 1000 याप्रमाणे या सरकारच्या कार्यकाळात 3052 तर सन 2015-16 मध्ये 390, सन 2016-17 मध्ये1252,  सन 2017-18मध्ये 2000 तर सन 2018-19 मध्ये 7000 याप्रमाणे या सरकारच्या कार्यकाळात 10642 इतके उद्दीष्ट चंद्रपूर जिल्हयासाठी निर्धारित करण्यात आले आहे. यापूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळाच्या तुलनेत यासरकारच्या कार्यकाळात उद्दीष्टातील ही वाढ तिप्पट आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार आता सदर योजनेचे एकूण उद्दीष्ट 7000 इतके झाले आहे.
            अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार  यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयातील ग्रामीण भागात रमाई आवास योजनेसाठी उद्दीष्टात झालेल्या भरीव वाढीमुळे मोठया संख्येने या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घेता येणार आहे.