पात्र शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावीत

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

परभणी/ प्रतिनिधी :-

  केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली असून यामध्ये 5 एकर शेती असणाऱ्या कुटुंबातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य तीन टप्प्यामध्ये मिळणार आहे. तरी पात्र शेतकऱ्यांनी आधारकार्ड व बँक पासबुकाची छायांकीत प्रत संबंधित गावचे तलाठी, ग्रामसेवक, सोसायटीचे सचिव, कृषी सहाय्यक गावात हजर राहतील त्यांच्याकडे शुक्रवार दि.8 फेब्रुवारी 2019 रोजी सादर करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केले आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांच्या कक्षामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्याबाबत दि.6 फेब्रुवारी रोजी बैठक संपन्न झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा उपनिबंधक मंगेश  सुरवसे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


ग्रामस्तरीय समितीमध्ये तलाठी हे समिती प्रमुख तर ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी, कृषी सहाय्यक आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचे सचिव हे सदस्य असणार आहेत. तरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पात्र शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केले आहे.