बफरमधील नाईट सफारीला विरोध

  • स्थानिक सल्लागार समीतीच्या बैठकीत निर्णय घेण्याची इको-प्रो मागणी
  • ताडोबा चे वनसंरक्षक व उपसंचालक यांना इको-प्रो चे निवेद

चंद्रपूरः/प्रतिनिधी:
 चंद्रपूर जिल्हा वाघांचा जिल्हा म्हणुन ओळखला जातो. या जिल्हयात वनक्षेत्र आणि वन्यप्राणी मोठया संख्येत आहेत. यामुळेच येथे ताडोबा नॅशनल पार्क, अंधारी अभयारण्य, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, घोडाझरी वन्यजीव अभयारण्य तयार करण्यात आले आहे. 2010 ला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफर झोन सुध्दा घोषीत करण्यात आलेले आहे. या संपुर्ण वनक्षेत्रात वन्यप्राणी मोठया संख्येने आहेत, सोबतच वनव्याप्त व वनलगतच्या गावांत मानव-वन्यप्राणी संघर्ष सुध्दा तीव्र आहे.

नुकतेच 1 फेब्रुवारी 2019 ला सुरू करण्यात आलेले नाईट सफारी हा प्रकार रात्रीच्या वेळेस वन्यप्राणीच्या दृष्टीने त्यांचा नैसर्गीक अधिवासात बाधा निर्माण करणारा आहे. मुळातच व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य हे वन्यप्राण्याचे अधिवास संरक्षण, त्याचे प्रजनन, स्वांतत्र अबाधीत राहावे याकरिता तयार करण्यात आलेले असतांना. दिवसा पर्यटनासोबतच आता रात्रीच्या वेळेत सुरू झालेले पर्यटन म्हणजे हा वन्यजीव अधिवासात होणारा हस्तक्षेप आहे. जिल्हयात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचला असुन दरवर्षी वाघ-बिबटच्या हल्ल्यात अनेक गावकरी मृत्युमुखी पडत आहेत. यामुळे वनविभाग व गावकरी यांच्यात प्रचंड आक्रोष निर्माण झालेला आहे. अनेकदा शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. आधीच दिवसा सुरू असलेल्या पर्यटनांमुळे वाघांसारख्या प्राण्यांना मनुष्यांच्या समोरासमोर येण्याची नैसर्गीक बंधने राहीलेली नाही, हे मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या निवारण्याच्या दृष्टीने योेग्य बाब नाही. जिल्हयातील मानव-वन्यप्राणी संघर्ष बघता नाईट सफारी सारखा प्रकार जिल्हयातील कुठलाही वनक्षेत्रात सुरू करणे चुकीचे आहे, यांसदर्भात नुकतेच इको-प्रो च्या बैठकीत या निर्णयास इको-प्रो संस्थेचा सदस्यांनी विरोध दर्शविला, या संदर्भातील मागणीचे निवेदन संस्थेचे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक बंडु धोतरे यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक श्री एन आर प्रवीण व उपसंचालक, बफर यांना निवेदन देण्यात दिले, या निर्णयावर पुर्नविचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महत्वाचे म्हणजे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत पर्यटनाबाबत गठीत करण्यात आलेली ‘स्थानीक सल्लागार समीती’ ची कुठलीही बैठक न घेता हा निर्णय घेण्यात आलेला आहे. 15 डिसेंबर 2017 रोजी गठीत करण्यात आलेली ‘स्थानिक सल्लागार समीती’ची सुध्दा अदयाप एकही बैठक झालेली नसुन याबाबत स्थानीक सल्लागार समीतीमध्ये निर्णय घेण्याची गरज आहे. या समीतीच्या निर्णयानंतर सदर नाईट सफारी सुरू करण्यात यावी अशी मागणी निवेदनातुन करण्यात आलेली आहे.