काय आहे? अशोक कुबडे लिखित 'गोंडर' कादंबरीत बलुतांचे जीवन!....




काय आहे? अशोक कुबडे लिखित 'गोंडर' कादंबरीत बलुतांचे जीवन!....
_
वाचा.... _____________________________________


दिनचर्या न्युज :-

कादंबरी : गोंडर
लेखक :अशोक कुबडे,नांदेड.
*"न्हावी समाजाची चित्तरकथा म्हणजे "गोंडर" ही अस्सल ग्रामीण जीवनातील आशय समाजातील वास्तविक जीवन व जगण्यातील संघर्ष मांडत परिवर्तनिय विचाराचे बीज पेरत जाणारी अप्रतिम कलाकृती म्हणजे अशोक कुबडे यांची "गोंडर"ही कादंबरी होय."*
अशोक कुबडे यांची गोंडर कादंबरी दत्ता डांगे यांनी इसाप प्रकाशनाने प्रकाशन करुन सर्व प्रथम अशोक कुबडे यांच्या हाती कादंबरीसह धनादेश हाती दिला त्या क्षणी अशोक सरांना अश्रू अनावर झाले. पहिल्या कलाकृतीचे स्वागत अशोक सरांनी अश्रू जलाभिषाकांनी केले. याचाच अर्थ कादंबरी लेखनातील त्यांची धडपड, घेतलेली मेहनत, कथानकातील विचार सूत्र,आणि महात्मा फुले ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची बीजे पुन्हा समाजात रूजवण्यात यशस्वी झाल्याची हीच पोचपावती आहे.अशोक कुबडे सर कवीच्या लेखनातील गोंडर ही कांदबरी अनेक कल्पनाच्या
वास्तवातील पकड कौतुकास्पद आहे.
कादंबरी अशोक सरांच्या हाती आली त्या क्षणी सरांना दिलेल्या शुभेच्छा अजूनही मला आठवतात ,*"हे अश्रू आपल्या प्रामाणिकपणे साहित्याची सेवा केल्याने ह्दयातील कादंबरीची कथा अश्रू रुपाने समोर येत आहे.सर हे अश्रू वाया जाणार नाहीत. याची दखल सारस्वत घेतीलच आपण सच्चे साहित्याचे सेवक आहात हे सिध्द होत आहे.माझेही डोळे आपले फोटो पाहिल्यानंतर भरून आले.नांदेड ही पवित्र भूमी आहे येथील मातीत पडलेले आपले अश्रू मोती होतील आणि साहित्यविश्वात आपले नाव अजरामर करतील कारण आपण साहित्ययोध्दा आहात .असा अभिप्राय दिला आणि कादंबरीचा आस्वाद घेण्याचा मनोदय केल्यानेच सरांची गोंडर ही कादंबरी हाती आली आणि वाचून एक नवा अनुभव घेता आला.एक चांगला अस्सल नजरांना मिळाल्याचा आनंद मनोमन झाला.*
गोंडर याकादंबरीत बारा बलुतेदार, त्यांची समाजातील स्थिती, ग्रामीण. बोलीभाषा, वाक्यप्रचार, म्हणी, बोलण्यातील लखब,गावातील लोकांचे जीवन जगण्यातील वैशिष्ट्ये, ग्रामीण परिस्थितीत भौगोलिक स्थान,गावचा ओढा, गावाभोवतालचे सृष्टीसौंदर्य,चालीरीती, ऋतुमानाप्रमाणे बदलणारे ग्रामीण जीवन,सण, उत्सव ,लोकजीवनातील जातीयता, सधनता, शेती बरोबर इतर व्यवयाय करणारे लोक, गावातील आपल्याच कामात गुंतणारे लोक,रिकामटेकडे लोक,स्त्रीजीवन,व्यसनाधीनता,गावचे राजकारण,परंपरेने चालत आलेले व्यवसाय,बारा बलुतेदार,सुगीच्या दिवसात बाहेरुन येणारे इतर वंचित समाजातील लोक ,शेजारील गावात चालणारी सरकारी कामासाठी आलेली जमात,तेथील वातावरण,कामगारांचे शोषण,पगाराच्या दिवसातील वातावरण,
असे अनेक घटनांचा आलेख आपणास गोंदर कादंबरी वाचतांना दिसून येईल या शिवाय अनेक प्रेमळ घटनांच्या झालराने कादंबरी वाचनीय होते.यातील कथानकांची मांडणी अतिशय सुंदर असून कादंबरीच्या कथानकातील पात्रे जीवंत व वास्तव वाटतात आणि आपल्या अवती भोवती त्यांचा वावार दिसून येतो.साध्या सोप्या भाषेतील मांडणी अतिशय उच्च प्रतिची असून छोट्या छोट्या चाळीस विभागात कादंबरी विभागली असली तरी कथेतील सातत्य टिकवण्यात अशोक कुबडे सर यशस्वी झाले आहेत.त्यांची पहिली कादंबरी असूनही कोठेच नवखेपणा दिसत नाही तर कसलेला साहित्यिक असल्याने कथा मनावर पकड घेत घेत जाते. कथानक चढत्या आलेखाने वर वर चढत जाते.महात्मा फुले ,आंबेडकर ,शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचाराची बीजे कथेतील पात्रात पेरत आपल्यावरील अन्याय, वाईट प्रथा, शिक्षणाशिवाय पर्याय नाही अशी जीवनमूल्ये लेखक कथानकातून मांडत जातो. म्हणून पुस्तक पूर्ण वाचत वाचक जातांना अशोक कुबडे सरांचे मनापासून केलेले लेखन व अनुभवांच्या कुचल्यातून चितारलेले कथेतील चित्रण अस्सल वाटते.
वारीक समाजाच्या समस्या सालकाठी त्यांच्या मेहनतीचा मोबदला 'बलुत' म्हणून ज्वारीच्या रुपाने नुसते ज्वारीचे गोंडरच मिळायचे,ही वेदना सहन करण्यापलीकडची आहे.अशी पध्दत बारा बलुतेदारीच्या माथी मारले गेली.कणगीत निव्वळ गोंडराचे दाणे असायचे.चटणी मीठासाठी ससेहोलपट कायमच व्हायची,त्यातून होणारी मानसिक कुचंबना, जगण्यातील संघर्ष ,अशा आठरापगड जातीचा जगण्यातील संघर्ष गोंडर या कांदबरीत आला आहे.
कादंबरीची विभागणी छोट्या छोट्या चाळीस भागात कथानक विस्तारित जाते.कादंबरीची पाठराखन करतांना अशोक कुबेर सर स्वतः म्हणतात,"*तळणी ता.हदगाव जि.नांदेड हे माझं जन्मगाव. माझं बालपण गावात गेलं.बापाची जगण्याची कसरत यातून होणारी कुंचबना अनुभवली. याच कुंचबनेत आपलं जगणं गुदमरते आहे.यातून मार्ग काढला पाहिजे म्हणून शिकले पाहिजे हा परिवर्तनाचा विचार मनात आला .विविध बाजूनी समाजाची होणारी फरफट ,त्यातून निर्माण झालेली मानसिकता -परिणामी माझ्या समाजाच्या व्यथा, वेदना या कादंबरीवर कथानक उभे करतांना मांडता आल्या.
आमच्या वडिलाकडून फुले, शाहू ,आंबेडकर विचाराची पेरणी मनात झाली होती.तसा मीही या विचारानी प्रेरित झालो.परिवर्तनवादी विचाराने मी झपाटून गेलो.न्हावी समाज हा व्यवस्थेने नाकारलेला समाज.या समाजाच्या व्यथा वेदना आणि अस्तित्वासाठीची धडपड, आमच्या बापासोबत सबंध न्हावी समाजानं भोगलेले दैन्य तसेच मी घेतलेला अनुभव कुठतरी शब्दबद्द झाला पाहिजे आणि येणाऱ्या नव्या पिढीला न्हावी समाजाची वास्तव आणि खडतर वाटचाल माहित झाली पाहिजे म्हणून या कादंबरीचा नायक यशवंत आणि अनेक पात्रातून हे कथानक उभे केले आहे.समाजाचं उत्तरदायित्व आपल्याकडं आहे.त्यातून समाजाप्रति आपण कृतज्ञता व्यक्त करावी या उदात्त भावनेने ही कादंबरी लिहायला घेतली.वास्तवाशी हितगुज करतांना काही जागी स्पष्ट आणि निर्भीड, सरळ बोलणं भाग होतं. ते त्या प्रसंगाला आणि पात्राला जिवंत करण्यासाठी गरजेचं होतं. यात कुठेही वास्तविक जीवनाला विसकळीत होऊ न देता प्रत्येकाला एक चांगला विचार देणारी कादंबरी व्हावी या उद्देशाने लिहिली आहे* ."अशा समर्पक शब्दात मनातल्या भावना ते व्यक्त करतात, काल्पनिक जीवनानाला सत्याची, अनुभवाची, वास्तवाचा बाज असावाच लागतो.त्याशिवाय त्यातील पात्रे,त्याचे जीवन आपल्या जीवनाच्या कानसावर घासूनच त्याचा उजळपणा माणून स्वीकारतो हे स्वीकारत आपल्या जीवनातील अनुभवाचे चटके तो शोधतो त्यावेळी कादंबरीच्या प्रत्येक पानापानातले वर्णन त्यास आपलेच आहे असे वाटते.हेच या कादंबरीचे यश आहे.
आपण कांबरीचे विभाजन केले तर वामन चे जीवन त्याच्या पत्नी शेवंताची त्यास मिळणारी साथ,, यशवंताच्या काळजाला बाणासारखे लागून मन घायाळ, अस्वस्थ मन शाळेत जायला तयार नसतांना त्यास आई शेवंता यशवंताला हिरवंपुवळं होईपर्यंत मारते,अक्षराची साधी ओळख नसलेने आपले जीवन.       जनावरासारखं झाले आहे.त्याचे दु:ख आपल्यासारखी अवखळा आपल्या लेकराची होऊ नये.ही पोटतिडिक आईची असते.आपल्या माथी मारलेल्या प्रथा आणि चालीरीती पाहून यशवंतांच्या समाजव्यवस्थेवर ,संस्कृतीवर चवताळत होती.अनुभवत होता,समाजाने टाकून द्यायचं आणि आपण लाचारी करायची ही हलकट पध्दत यशवंताच्या बालमनाला अस्वस्थ करुन त्याविरूद्ध बंड करण्याचे प्रण करणारा यशवंतांच्या,बंड्या चैनीची हळुवार प्रेमकथा,बाप्पाचे दारुपिणे त्यातून घरात होणारा कोडंमारा, मामाची मदत, यात्रेतला प्रसंग, वामनाचे दारुड्याच्या संगतीने दारु पिऊन पंग होणे.मारझोड,त्यातून शिकण्याचा प्रण करणारा यशवंता अज्ञानाच्या कचाट्यात सापडलेलं आपलं घर दु:खाच्या अंधाऱ्या काळोखातून निवांत बसलेल्या जीवाला ज्ञानाचा प्रकाश दाखवण्यासाठी आपल्याला शिकवे लागणार ही भावना रुजवणारे विचार त्याच्या मनात येतात आणि तो त्या दिशेने वाचचाल करतो.त्या वाटचालीत उमा आणि त्याचे मनोमिलन होते, विचार जुळतात, उमा सर्वोतोपरी त्यांची होते.साथ देते,यशवंतांच्या नविन परिवर्तन विचाराने पेटून उठतो व बंड करायला लागतो.त्यातून परिवर्तन होतेच.
 कादंबरीत अनेक गावपातळीवरील म्हणी,लोकांच्या लखबी फारच उत्तम पद्धतीने मांडणी केली आहे.जसे, "आठोडकरी सदा भिकारी, सणाच्या दिवशी दुस-याच्या दारी ",बाराटक्के, कुत्र्याचं शेपूट वाकडी ते वाकडीचं,गरिबीने आपल्या तोंडाला मुसकं बांधलं होतं,ते तोडणे म्हणजे गुन्हा.,जनावरासारखं कुटार म्हणून गोंडर खाणारी जात आमची वाद घालणार तरी कशी? जे गुरंढोरं खात नाहीत ते आमच्या माथी मारलं जातं,झाडावर राहायचं तर पक्षाशी अबोल नको,भाकरीतल्या काळ्या पटके बसलेल्या डागासारखी त्याच्या मनात समाजव्यवस्थेविषयी चटके बसत होते,वारकाचं तोंड दाड असतं.ते पाहिल्यावर सनी लागते अन्  पहाटे पाहिलं तर दिवसभर एक काम नीट होत नाही,मी आता यात सडणार नाही मला शाळा शिकू द्या, या व्यवस्थेवर मला मात करायची आहे ही व्यवस्था वर्णभेद -जातीभेद करणारी संस्कृती मला मातीत गाठायची आहे,मेरे मजबमे नाही. जोपर्यंत माहित नव्हतं,तोपर्यंत पिली,  पण कळाल्यावर. हमारे में दारु पिना  हराम है!उसे छुना तक नही, एक तो दारु और व्याज खाना, बहुतही हराम है! , "मुसलमानातील नमाजी माणसांची खूप इज्जत असते, "माहीत नाही अन् सापाच्या बिळात हात घालू नये., यशवंताची आई आपले पावित्र्य जपतांना रंगरावनाला दिलेला इशा-यात तिचा  रणरागिनीचा अवतार फारच उद्वेगाने मांडणी करतांना लेखक कमी पडत नाहीत ,"( पान क्र. ५८) *रंगराव ,याला इळा मनत्यात त्याच ईळ्याच्या आणीवर  आम्ही लोक आमचं पोट. भरतो.जवा आमच्या इज्जतीवर हात उठतो-तर याच ईळ्याने तो हात बुडापासून छाटून टाकायला आम्ही मागं पुढं पाहत नाही .ज्या ईळ्याच्या आणीवर आम्ही पोट भरतो तोच ईळा वेळप्रसंगी प्रतिकाराला पोटात खुपसून आतडे बाहेर काढण्याची ताकद असते गरिबाची ,एवढं लक्षात ठेवा.अन् इथून निघा "*असा खतरनाक इशारा देणारी आईचे वर्णन वाचतांना अंगावर काटे येतात ,यशवंताचे विचार ,*अशिक्षितपणा आणि कर्मकांडाच्या जोखडात हा समाज दारिद्र्यात पिचत आहे .अशा प्रखर आणि प्रभावीपणे सांगणा-या गाडगेबाबा ,महात्मा फुले ,डाँ.बाबासाहेब ,शाहू यांच्या विचारांचा त्यानं जीवनमार्ग निवडला होता, परिवर्तनवादी विचाराचा त्याच्यावर प्रभाव होता गाडगेबाबा,तुकडोजी महाराज, बाबासाहेबांचे पुस्तक तो वाचत होता.म्हणूनच असे कर्मकांड थांबवले पाहिजे असे तो आईला सांगत होता*.अशा अनेक शब्दकोटीने कादंबरी सजवली  आहे,यातील कथानक उमा यशवंत, वामन शेवंता,भिवा, चैनी,मुनीम पठाण,पाटील,संभा, बळी,सदा,पिदाड्या,भिवा,रम्या,बंड्या,मारत्या,शिक्णासाठी धडपडणारे कदम गुरुजी,काॅलेजचे प्रिन्सीपल,यशवंत व उमाचे परिवर्तनिय संवाद, उमाचा निर्णय,यशवंताची समाजातील मुलाविषयी तळमळ,गावातील राजकाणात लोकांचे पैसे घेऊन केलेले मतदान,बदलाचे नवे वारे घेऊन ही कांदबरी वाचकापुढे येत आहे.तिचे स्वागत सर्वच थरातून होईल.
कांदबरीतील कथानकास अनुसरून काढलेली रेखाचित्रेही अतिशय योग्य असून कथानकाला उजाळा देणारी आहेत.सूप व सुपातील धान्य अशा स्वरूपाचे सुरवातीचे चित्र अप्रतिम आहे.प्रमोद दिवेकरांनी मुखपृष्ठ कौतुकास्पद पात्र ठरणारे आहे .प्रकाशक दत्ता डांगे इसाप प्रकाशन यांनी आपले मित्रऋण चांगलेच निभावले आहे .त्याच्याच प्रयत्नामुळे गोंडर सारखी कलाकृती आपल्या हाती आली म्हणून त्याचे हार्दिक अभिनंदन.सौ.अर्चना अशोक कुबडे या आपल्या सुविधा पत्नीला सरांनी अर्पण करुन त्याचाही वाटा या कादंबरीत असल्याची पोच पावती दिली आहे.अक्षर मांडणी करणारे विजयकुमार चित्तरवाड यांनीही आपली भूमिका अतिशय उत्तम रितीने पार पाडली आहे.आर्टी आँफसेट प्रिंटर, लातूर,यांनी कांदबरीची बांधणी चांगलीच केलीआहे .मलपृष्ठ डाॅ.जगदीश कदम ,नांदेड यांनी ," *बाबासाहेबांचे विचार शिरोधार्थ मानून सामाजिक परिवर्तनाची पायवाट प्रशस्त करु पाहणारा हा नायक पारंपारिक विचारांच्या विरोधात कशा रीतीने संघर्ष करतो ; याचा पट मांडणारी ही वर्तमान कथा आहे .कथानकाला गतिमान करणारी भाषा आणि निवेदनातील नेमकेपणा यामुळे ही कादंबरी वाचणीय झालेली आहे.*"अशा  शब्दात कौतुक केले आहे. कांदबरीचे स्वागत मुल्य चारशेपन्नास रुपये मात्र आहे.ही सर्व कांदबरी ज्यांच्या विचारधारेवर आधारित आहे त्यांनाच म्हणजे महात्मा फुले यांच्या विचारांना समर्पित केली आहे.या कादंबरी विषयी लिहिण्यासारखे भरपूर आहे मी माझ्या अल्पबुध्दीने त्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला.तो आपण समजून घेऊन वाचन कराल हीच अपेक्षा.अशोक सरांना त्यांच्या लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा!

*कादंबरी : 'गोंडर'*
  *लेख्क : अशोक कुबडे,नांदेड*
               मो.९७६७१९१३०३
*प्रकाशक :दत्ता डांगे* इसाप प्रकाशन,नांदेड,
                मो.९८९००९९५४१
*मुखपृष्ठ : प्रमोदराव दिवेकर*
स्वागत मुल्य : ४५० रुपये.      *आस्वादक*
       *मुबारक उमराणी*
       शामरावनगर, सांगली
        ९७६६०८१०९७.

साभार - गोंडर या कादंबरीचा....!