भाग्यश्रीची हत्या करणाऱ्यांना त्वरित अटक करा

खटाव तालुका  नाभिक समाजाची मागणी : तहसीलदारांना निवेदन

मायणी / प्रतिनिधी ता.खटाव जि.सातारा(सतीश डोंगरे)

करपेवाडी ता पाटण येथील भाग्यश्री संतोष माने हिची हत्या करणाऱ्या दोषींना  त्वरित अटक करून त्यांना कठोर शासन करा अशी मागणी येथील नाभिक समाजाच्या महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. यावेळी खटाव तालुक्यातील सर्व नाभिक समाज बांधव उपस्थित  होता.

       निवेदनातील  माहितीनुसार  भाग्यश्री उर्फ सोनाली संतोष माने हीचा धा तरदार शस्त्राने खून करण्यात आला असल्याचा आम्हाला संशय आहे. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. भाग्यश्री माने हिची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. एका गरीब कुटुंबातील युवतीचा खुनाच्या या घटनेमुळे आम्हा सर्व नाभिक समाज बांधवात असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे.

      तरी या घटनेचा पोलीस यंत्रणेने सखोल तपास करून दोषी आरोपींना तातडीने अटक करून कठोर शासन करावे . तसेच ३१ जानेवारी पर्यंत तातडीने तपास न लावल्यास नाभिक समाजाच्या वतीने १ फेब्रुवारी ला पूर्ण सातारा जिल्हा बंद ठेवून  या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी चे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.