प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना ‘भारतरत्न’ जाहीर

दिल्ली/वृत्तसंस्था:

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आज भारत देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचे सुपूत्र ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख व प्रख्यात गायक भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

केंद्र शासनाने आज देशातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ पुरस्कारांची घोषणा केली. राष्ट्रपती महोदयांच्या स्वाक्षरीचे सन्मान पत्र आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
महाराष्ट्ररत्न नानाजी ठरले भारतरत्न
हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या गावी ११ ऑक्टोबर १९१६ मध्ये नानाजी देशमुख यांचा जन्म झाला. नानाजी यांनी भारतीय संस्कृतीच्या आधारावर मनुष्याचा सर्वांगिण विकास होऊ शकतो या विचाला मध्यवर्ती ठेवून देशभर रचनात्मक व शाश्वत विकास साधणारे समाजकार्य केले. पांचजन्य, राष्ट्रधर्म आणि स्वदेश या नितकालिकांचे जबाबदारी त्यांनी सांभाळली. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही नानाजी देशमुख सहभागी झाले. देशातील शेतकऱ्यांना सिंचनाच्याबाबतीत स्वयंपूर्ण करण्यात त्याचे मोलाचे योगदान राहीले आहे. गोवंशसंवर्धन, पारंपरिक कृषी पध्दतीचा विकास व प्रसार, गुरुकुल पध्दतीने शालेय शिक्षण, उद्योजकता विद्यापीठाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराला प्राधान्य,आरोग्यधाम योजनेंतर्गत आयुर्वेदिक वनौषधींविषयी संशोधन आदी महत्त्वपूर्ण कार्य नानाजींनी केले. 

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या राजकीय योगदानाची दखल
प्रसिध्द अर्थतज्ज्ञ व ज्येष्ठ राजकारणी म्हणून प्रणव मुखर्जी ओळखले जातात. पश्चिम बंगाल मध्ये ते भारत देशाचे १३ वे राष्ट्रपती ठरले. ११ डिसेंबर १९३५ मध्ये जन्मलेले प्रणव मुखर्जी हे ६ दशकांच्या सक्रिय राजकारणात लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य राहिले. केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री, परराष्ट्रव्यवहार मंत्री, संरक्षणमंत्री, वाणिज्य व उद्योग मंत्री आदी पद त्यांनी भुषविली आहेत. भारतदेशाचे प्रथम नागरिक अर्थात राष्ट्रपती म्हणून त्यांनी यशस्वीपणे पाच वर्ष कार्य केले. 
भूपेन हजारिकांच्या अविट व अमिट सुरांचा सर्वोच्च सन्मान
प्रसिध्द गायक व संगितकार भूपेन हजारिका यांच्या अविट व अमिट सुरांची दखल घेवून त्यांना मरणोत्तर देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न जाहीर झाला आहे. आसाममध्ये ८ डिसेंबर १९२६ जन्मलेले हजारिका यांनी वयाच्या १० व्या वर्षापासून आसमी भाषेत गायनास सुरुवात केली. कलकत्त्यात वयाच्या दहाव्यावर्षीच त्यांचे पहिले गाणे रेकॉर्ड झाले होते. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी पहिले गाणे लिहीले. बंगाली गीतांना हिंदीत अनुवादीत करून स्वर देत असत. रूदाली, मिलगयी मंजील मुझे, साज, दरमिया, गजगामिनी, दमन आणि क्यों या सुपरहीट चित्रपटांचे गीत लिहीले. हजारिका यांनी एकूण १ हजार गीत रचणा केल्या व एकूण १५ पुस्तके लिहिली.