विज कनेक्‍शन कापले जात असेल तर नागरिकांनी त्‍वरीत भाजपा पदाधिका-यांशी संपर्क साधावा, सुधीर मुनगंटीवार

विज बिल न भरल्‍यास विजेचे कनेक्‍शन कापण्‍यात येवू नये !



  • आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी !
  • विज कनेक्‍शन कापले जात असेल तर नागरिकांनी त्‍वरीत भाजपा पदाधिका-यांशी संपर्क साधावा !
चंद्रपूर : कोविड 19 च्‍या जागतीक महामारीचा सामना करताना करण्‍यात आलेल्‍या लॉकडाऊनदरम्‍यान महावितरण कंपनीतर्फे विज ग्राहकांना भरमसाठ रकमेची बिले पाठविण्‍यात आली आहे. कोणीही विज बिल न भरल्‍यास विजेचे कनेक्‍शन कापण्‍यात येवू नये, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. जर विजेच्‍या बिलाचा भरणा केला नाही म्‍हणून विज कनेक्‍शन कापले जात असेल तर नागरिकांनी त्‍वरीत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींनी संपर्क साधण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले आहे.
कोरोना कालावधीत थकबाकीसाठी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करण्याचे आदेश उर्जामंत्र्यांनी दिले आहेत. बिलासंबंधीच्या तक्रारीला अनुसरून ग्राहकांच्या घरी महावितरणच्या कर्मचा-यांनी भेटी देऊन तपासणी करू नये, अशा सूचनाही उर्जामंत्र्यांनी महावितरण प्रशासनाला दिल्या आहेत. असे असताना वीज ग्राहकांना त्‍वरीत भरणा करा अन्‍यथा वीज कनेक्‍शन कापण्‍यात येईल असे सांगण्‍यात येत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. आधीच कोरोनात आर्थिक संकट, त्‍यात वीज कनेक्‍शन कापल्‍याने नवे संकट वीज ग्राहकांवर येईल. विजेचा वापर झाला नसतानाही अव्वाच्या सव्वा वीज बिल आकारले जात असल्याच्या तक्रारीही काही जण करत आहेत. त्यामुळे वीज बिल पाहूनच अनेकांना मोठा ‘‘शॉक’’ बसला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा अशी मागणी वीज ग्राहकांतर्फे करण्‍यात येत आहे. अशातच वीज कनेक्‍शन कापण्‍याच्‍या भितीने वीज ग्राहक चिंताग्रस्‍त झाले आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेली बिकट आर्थिक परिस्‍थीती लक्षात घेता राज्‍य सरकारने सुध्‍दा या तीन महिन्‍यांच्‍या विज बिलात ग्राहकांना सुट द्यावी, अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍यासह माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंह चंदेल, आ. किर्तीकुमार भांगडीया, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्‍हा परिषद उपाध्‍यक्षा सौ. रेखा कारेकर, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, अॅड. संजय धोटे, सुदर्शन निमकर, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, जिल्‍हा भाजपाचे सरचिटणीस संजय गजपूरे, ब्रिजभूषण पाझारे, रामपाल सिंह आदींनी केली आहे.