उद्घाटने झाली , पाणी कुठे आहे?अमृत कलशचे उद्घाटने बंद करा नागरिकांना मुबलक पाणी द्या - आ. किशोर जोरगेवार





उद्घाटने झाली , पाणी कुठे आहे?अमृत कलशचे उद्घाटने बंद करा नागरिकांना मुबलक पाणी द्या - आ. किशोर जोरगेवार

मनपा अधिका-र्यांशी बैठक, अनेक विषयांवर चर्चा

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
एकाच योजनेचे तिनदा उद्घाटन करुनही अमृत कलश योजनेच्या माध्यमातुन अद्यापही पाणी पूरवठा सुरु करण्यात आलेला नाही. मग अमृत कलश योजना पुर्णपणे कार्यान्वित होण्याअगोदरच उद्घाटनाची घाई का करण्यात आली असा प्रश्न उपस्थित करत आता अमृत कलशचे उद्घाटने बंद करा पहिले नागरिकांना मुबलक पाणी द्या अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला केल्या आहे.
मनपा हद्दीत येणाऱ्या विविध समस्यांना घेऊन आज आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिका-र्यांची बैठक घेतली. आयुक्त यांच्या दालनात आयोजित बैठकीला मनपा आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल, उपायुक्त अशोक गराटे, शाखा अभियंता महेश बारई, सहाय्यक अभियंता अनिल घुमडे, मुख्य स्वच्छता निरीक्षक अनिरुध्द राजुरकर, अभियंता रविंद्र हजारे, उप नगर रचनाकार जयदिप मांडवगडे, आरोग्य विभागाचे डॉ. गर्गेलवार यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहराध्यक्ष राशेद हुसेन, प्रसिध्दी प्रमुख नकुल वासमवार आदिंची उपस्थिती होती.
दरवर्षी चंद्रपूर शहरात पाण्याची टंचाई निर्माण होते. यावर अद्यापही मनपा प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केलेल्या नाहीत. आता उन्हाळा तापत आहे. त्यामूळे पाणी समस्या निर्माण होत असलेल्या भागाकडे विशेष लक्ष देत नळाच्या माध्यमातुन नियमित पाणी पूरवठा करा तसेच काही भागात टॅंकरच्या माध्यमातुन पाणी पूरवठा करुन तेथील पाणी टंचाई दुर करा अशा सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला दिल्या आहेत. अमृत कलशचे कनेक्शन देण्याचे काम युध्द स्तरावर पुर्ण करा, सप्टेंबर महिण्यापर्यत 60 हजार कनेक्शन पूर्ण करण्याचा लक्ष ठेवा, अमृत कलश योजनेसाठी 16 झोन तयार करण्यात आले आहे. यातील 10 झोनमध्ये प्रायोगिक तत्वावर प्रयोग पुर्ण करण्यात आले आहे. उर्वरित 6 झोनमध्येही प्रायोगिक तत्वावरील काम पूर्ण करुन लवकरात लवकर सदर योजना कार्यान्वित करण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिका-र्यांना केल्या आहे.
जटपूरा गेटची वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी नियोजन करा, सराई मार्केट कडून फहिम गेस्ट हाउस कडे निघणारा मार्ग सुरु करुन दुचाकी वाहणे या मार्गाने वळविण्यात यावी तसा प्रस्ताव तयार करुन मनपाने जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला केल्या आहेत. इरई धरणातुन शहरात पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईप लाईन वांरवार लिकेज होत आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याच्याही सुचना यावेळी मनपा प्रशासनाला देण्यात आल्या आहे. अमृत कलशसाठी खोदलेले रस्ते तसेच सोडण्यात आले आहे. त्या रस्त्यांची तात्काळ डागदूजी करण्यात यावी, मनपाकडे प्रस्तावित असलेली 44 विकास कामे युध्दस्तरावर पुर्ण करण्यात यावी, अनेक विभागाअंतर्गत मनपा क्षेत्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन दिल्या जाऊ शकतो, त्यामुळे मनपाने तसे कामे सुचवावी, बाबुपेठ उड्डाण पुलासाठी मनपाने दयायचे असलेले 5 कोटी रुपये तत्काळ अदा करावे, पावसाळ्या पुर्व नाले सफाई करावी, शहरातील स्वच्छतेकडे मनपा प्रशासनाने लक्ष द्यावे, झोपडपट्टी धारकांना कायमस्वरुपी जागेचे पट्टे देण्याची प्रक्रिया गतिशील करा, उर्वरित सर्व झोपडपट्टयांचे सर्वेक्षण तत्काळ पूर्ण करावे, दिव्यांग बांधवांना स्वंयमरोजगार देण्यासाठी आम्ही स्टाॅल उपलब्ध करुन देणार आहोत सदर स्टाॅल लावण्यासाठी मनपाने ठिकाणच्या जागा निर्धारित कराव्यात, तुकुम येथे स्मशानभुमी नसल्याने येथील नागरिकांना अंत्यविधी करण्याकरिता दूरवर जावे लागते. त्यामुळे मनपाने येथे वेकोलीची जागेवर स्मशानभुमी तयार करण्यासाठी सदर जागा निर्धारित करत तसा आराखडा जिल्हाधिका-र्यांकडे सादर करावा, शहरातील कामगार चौकात कामगारांना उभे राहण्यासाठी सेडचे बांधकाम करावे आदी सुचना यावेळी मनपा प्रशासनाला आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.