सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढण्याचा विडा फक्त शरद पवारच उचलू शकतात - छगन भुजबळ




देशात भीतीचं वातावरण तयार केलं जातं आहे - छगन भुजबळ

सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढण्याचा विडा फक्त शरद पवारच उचलू शकतात - छगन भुजबळ

*देशातील सर्वांनी एकतेचे हत्यार तयार करून लढले पाहिजे*


दिनचर्या न्युज :-
दिल्ली दि. ११ सप्टेंबर -
देशात सध्या भितीचे वातावरण आहे आणि या देशातील भीतीच्या वातावरणाच्या विरोधात लढण्यासाठी लोक तयार आहेत आणि ते सर्वजण पवार साहेबांकडे आशेने पाहत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढण्याचा विडा फक्त शरद पवारच उचलू शकतात असा विश्वास राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्लीत व्यक्त केला. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 8 व्या राष्ट्रीय अधिवेशनाला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली होती.यावेळी ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, की सत्ताधाऱ्यांकडून रोज कोणावर ना कोणावर इडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या धाडी टाकल्या जात आहेत. अशाप्रकारे रेड टाकून आपल्या विरुद्ध बोलणाऱ्या व्यक्तींना शांत बसवण्याचे काम सध्या देशात सुरू आहे मात्र ज्या लोकांवर रेड पडते त्यापैकी कोणी भाजपामध्ये प्रवेश केला तर मात्र तो स्वच्छ होतो आम्ही मात्र अशा प्रकारच्या दबावाच्या राजकारणाला घाबरणार नाही.

ते म्हणाले की, ज्यावेळी केंद्रातील हे सरकार सत्तेत आले त्यावेळी अनेक आश्वासने या जनतेला त्यांनी दिली होती मात्र यापैकी एकही आश्वासन यांना पाळता आले नाही आज प्रत्येक घटकाचे शेतकरी असेल कामगार असेल किंवा छोटा व्यवसाय असेल हे मोठ्या अडचणीत सापडले आहेत असे असूनही केंद्राकडून कोणतीही मदत दिली जात नाही.

अच्छे दिन चे स्वप्न दाखवणार्यांनी आम्हाला आमचे जुनेच दिवस परत द्यावेत अच्छे दिन चे स्वप्न दाखवताना जे सर्वसामान्यांच्या हातात होते ते देखील लुटून हे सरकारी घेऊन गेले आहे त्यामुळे आम्हाला आमचे जुनेच दिवस परत द्या अशी मागणी यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. देशातील महागाई वाढली आहे सर्व सीमा ओलांडून महागाई पुढे गेली आहे. आम्ही कधीही ज्या गोष्टींवर टॅक्स लावला नाही त्या गोष्टींवर हे सरकार जी.एस.टी लावत आहे. अन्नधान्य, दूध, दही, ताक यावर सुध्दा जी.एस. टी लावला जात आहे. कोणी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाले तर त्याला देखील जी.एस.टी द्यावा लागतो अशी परिस्थिती देशात आहे. एव्हढेच नाही तर मुलांच्या शिक्षणावर देखील GST लावला जात आहे आणि ही गोष्ट अतिशय दुर्दैवी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

जश्या निवडणुका येतील तश्या जातीय दंगली घडवल्या जात आहेत.
देशातील जातीयता आणि धर्मांध राजकारणावर बोलताना त्यांनी ये तो शुक्र है कि परिंदों को नहीं पता उनका मजहब क्या है " यह तो शुक्र है कि परिंदों को नहीं पता उनका मजहब क्या है वरना आसमान से भी खून की बारिश होती" अश्या शब्दात आपल्या भावना त्यांनी व्यक्त केले.