वृक्ष लागवड हीच वसुंधरेला मानवी परतफेड - मा. आ. श्री. सुधीर मुनगंटीवार



वृक्ष लागवड हीच वसुंधरेला मानवी परतफेड - मा. आ. श्री. सुधीर मुनगंटीवार

दिनचर्या न्युज

चंद्रपुर १ जुलै - वृक्ष लावणे हा केवळ कार्यक्रम नसुन हे ईश्वरीय कार्य आहे, गेल्या 5 वर्षात सर्वांच्या मदतीने वृक्ष लागवडीचे विक्रमी मिशन राज्यभर यशस्वीरित्या राबविले. आज आषाढी एकादशी, डॉक्टर्स डे, महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस तसेच वनसप्ताहाचा पहिला दिवस, अश्या या वैशिष्ट्यपुर्ण दिवशी जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या वृक्षांची भव्य लागवड करण्याचा महानगरपालिकेचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आमदार मा. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
बुधवार 1 जुलै रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे चंद्रपूर शहरातील हवेली गार्डन परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात आ. सुधीर
मुनगंटीवार बोलत होते. यावेळी त्यांनी वृक्षारोपण केले. महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर तथा स्थायी समिती सभापती श्री. राहुल पावडे,आयुक्त श्री. राजेश मोहीते, उपायुक्त श्री. विशाल वाघ, श्री. गजानन बोकडे, सभापती महिला व बालकल्याण सौ. शितल गुरनुले, झोन सभापती श्री. प्रशांत चौधरी, सौ. कल्पना बगुलकर, श्री. देवानंद वाढई, बंडू धोतरे, डॉ. गुलवाडे, महानगरपालिकेचे नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात मनपा डॉक्टर्स, परिचारिका, शिक्षक, सफाई कर्मचारी, अधिकारी कर्मचारी कोरोना योद्धा म्हणून सतत कार्यरत आहेत, मनपाची टीम अतिशय उत्तमरीत्या काम करते आहे, आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडत आहे. या काळात आपली म्हणजे नागरीकांचीही जबाबदारी मोठी आहे, त्यामुळे कोरोनाचा प्रचार प्रसार होऊ न देण्यास सर्वांनी SMS ( सोशल डिस्टंसिंग, मास्क, सॅनिटायझर ) या त्रिसुत्रीचा वापर सार्वजनीक जीवनात करणे आवश्यक आहे.
   स्व. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात हरितक्रांतीची सुरवात केली. वृक्ष हा जन्मोजन्मीचा सोबती आहे, प्राणवायुपेक्षा महत्वाचे काहीच नाही, यासाठी भविष्यात पैसे मोजण्याची गरज भासु नये म्हणुन निःशुल्क प्राणवायुचे स्रोत  असलेल्या वृक्षांचंही लागवड अतिशय महत्वाची आहे.  वृक्षलागवडीच्या माध्यमातुनच आपल्याला लाभणार आहे. वृक्षामध्येच विठ्ठल समजुन प्रत्येकाने वृक्षारोपणाला सुरवात करावी असेही आमदार मा. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
   आ. मुनगंटीवार यांनी वनमंत्री असताना ५ वर्षात करण्यात आलेल्या या विक्रमी वृक्षलागवडीची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा मन की बात ' या कार्यक्रमात या मोहिमचे कौतुक केले. फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियानुसार या काळात मोठ्या प्रमाणावर हरीतक्षेत्रात वाढ झाली.   वृक्षलागवडी संदर्भात जे बहुमोल कार्य राज्यात केले त्यापासुन प्रेरणा घेवून वनसप्ताहाचे औचित्य साधुन आम्ही महानगरपालिकेतर्फे वृक्ष लागवड करीत आहोत. हे शहर हरीत, स्वच्छ व सुंदर राहावे यादृष्टीने आमचा प्रयत्न आहे. या प्रयत्नाला जनतेने साथ देण्याचे आवाहन महापौर सौ. राखी कंचर्लावार यांनी यावेळी बोलतांना केले.
    कोरोना काळात प्रशंसनीय कार्य करीत असल्याबद्दल मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले, डॉक्टर्स डे निमित्त मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. किर्ती राजुरवार, डॉ. अश्विनी भरत, परिचारिका व आरोग्य कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला.  नगरसेवक श्री. देवानंद वाढई यांचा वाढदिवस असल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी विविध पदाधिकारी, सर्व पक्षीय नगरसेवक, अधिकारी या सर्वांनी विविध जागी एकाचवेळी व्हिसल वाजताच वृक्षारोपण केले.