द्रौपदी मुर्मू, खळतळ प्रवासातून राष्ट्रपती पदाकडे ?





द्रौपदी मुर्मू, खळतळ प्रवासातून राष्ट्रपती पदाकडे ?


दिनचर्या न्युज :-

ही कहाणी आहे एका शिक्षिकेची, ही कहाणी आहे एका झुंजार आदिवासी महिलेची, ही कहाणी आहे एका निस्वार्थी समाजसेविकेची, ही कहाणी आहे एका अध्यात्मिक प्रवासाची, ही कहाणी आहे एका जिद्दी समर्पित जीवनाची, ही कहाणी आहे द्रौपदी मुर्मू यांची.
काल-परवा पर्यंत फारसे कोणाला माहीत नसलेले द्रौपदी मुर्मू यांचे नाव आज खूपच चर्चेत आहे. राष्ट्रपतीपदाची त्यांची ऊमेदवारी घोषित होईपर्यंत तसे त्यांचे नाव अज्ञात होते. एका आदिवासी, गरीब, सामान्य कुटुंबातील महिलेला राष्ट्रपतीपदासारख्या सर्वोच्च पदाची ऊमेदवारी मिळते, हीच मुळी आपल्या शक्तीशाली लोकशाहीची थक्क करणारी सुंदर साक्ष आहे. भारतासारख्या खंडप्राय देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या ऊमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे.विशेषतः सर्वच स्त्रियांना द्रौपदी मुर्म यांचा जीवनसंघर्ष भावूक करणारा व प्रेरणादायीही आहे. घराणेशाही,अमर्याद संपत्ती आणि खानदानाचा दर्प नसलेल्या सामान्य माणसाला अभिमान वाटावा अशीच कहाणी ही द्रौपदी मुर्मू यांची आहे.
ओरीसा राज्यातील मयुरभंज जिल्ह्यात एका अत्यंत सामान्य आदिवासी कुटुंबात त्यांचा जन्म २० जून १९५८ रोजी झाला. १९७९ साली त्या पदवीधर झाल्या. ओरिसा सरकारच्या सिंचन खात्यात कारकून झाल्या. पुढे त्या शिक्षक झाल्या. नेगरसेवक झाल्या. आमदार झाल्या. मंत्री झाल्या, राज्यपाल झाल्या. आणि आता राष्ट्रपतीदाच्या ऊमेदवार. घराणेशाही नाही,संपत्ती नाही,वारसा नाही. सारेच कसे थक्क कणारे आहे. त्यांच्या पतीचे नाव शाम चरण मुर्मू आहे.
आजही त्या मयुरभंज येथे एका साध्या दुमजली घरात राहतात. ६४ वर्षाच्या द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. दलित, आदीवासी, लहान मुले यांच्या ऊत्थापनासाठी झटणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांची वैयक्तिक जीवनात अनेक संकटामुळे अक्षरशः होरपळ झाली. कोणीही कोलमडले असते. त्याही कोलमडल्या. पण पुन्हा ऊभ्या राहिल्या. ताठ ऊभ्या राहिल्या. त्यांना दोन मुले व एक मुलगी. २००९ साली २५ वर्षाचा मुलगा मरण पावला. हा धक्का त्यांना सहन झाला नाही. त्या डिप्रेशन मध्ये गेल्या. जीवनातील सारे स्वारस्य निघून गेले.खचुन गेल्या. याचवेळी त्या प्रजापिता ब्रम्हकुमारी या अध्यात्मिक संस्थानात गेल्या. त्या अध्यात्माला शरण गेल्या. त्या पुन्हा ऊभ्या राहतात तोच दुसरा मुलगा २०१३ साली रस्ता अपघातात गेला. त्याच महिन्यात आई गेली, कर्तबगार भाऊही गेला. चार वर्षात जवळची सगळी माणसे हरवली. आणि २०१४ साली पती शाम चरण मुर्मूही गेले. त्या एकाकी झाल्या. नियतीने त्यांच्यावर घोर अन्याय केला.
परंतु अध्यात्म त्यांच्या सोबत होते. त्यांनी दलित, आदिवासी यांच्या सेवेत स्वतःला झोकून दिले. स्वतःचे दुःख जगाच्या दुखात मिसळून टाकले. पुन्हा ताठपणे ऊभ्या राहिल्या. २०१५ साली झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून पाच वर्षे काम केले. लवकरच विनम्र स्वभावाच्या कठोर प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक झाला.२०२१ पर्यंत त्या राज्यपाल होत्या.
२० जून रोजी त्यांचा वाढदिवस होता. आणि २१ जून भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्या नावाची घोषणा झाली. त्यांना हा आनंदाचा धक्का होता आणि देशालाही. त्या नेहमी प्रमाणे शिवमंदीरात गेल्या. स्वतः झाडू घेऊन मंदीर स्वच्छ केले. मंदीरातील कर्मचाऱ्याबरोबर सुखसंवाद केला. मयुरभंजमध्ये जल्लोष झाला.

द्रौपदी मुर्मू खळतळ प्रवासातून राष्ट्रपती पदाकडे!
या एका लहानशा घरातून ३५० एकर परिसर,१९० एकर बगीचा व ७५० कर्मचारी असलेल्या प्रशस्त राष्ट्रपतीभवनात लवकरच जातील. एक सामान्य शिक्षिका भारताची राष्ट्रपती होईल. हे भारतीय लोकशाहीचे केवढे नितांत सुंदर व विलोभनीय रुप आहे बरे!