निसर्गाचा प्रकोप आणि सरकारची कुंभकर्णी झोप




   कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा

     लोणखेडे - जवा दुष्काळ घिरट्या घाली, तवा बळीराजाला कुणीना वाली असच चित्र सध्या दिसते . सततचा दुष्काळ त्यातही यावर्षीचा महाभयंकर दुष्काळ यातुनही मार्ग काढीत कसाबसा पिकविलेला कांदा आज जेव्हा कवडीमोल भावाने विकला जातो, रस्त्यावर फेकला जातो , तेव्हा शेतकरी व त्याच्या कुटूंबातील प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू उभे राहतात. दिनवानी होऊन शेतकरी राजा म्हणतो मी कसला राजा? राजा तर कुंभकर्णी झोप घेतोय..आणि शेतकरी राजाला कायमच सरणावर झोपवायची सोय करतोय.
 
      लोणखेडे गावातील शेतकरी काल चांदवड बाजारपेठेत कांदा विक्रीस घेऊन गेले कांदा चांगल्या प्रतीचा असूनही त्याला कवडीमोल दर मिळाला . सर्व स्वप्नं दुःखाश्रू बनून वाहू लागले  शेतकरी जाईल तरी कुठं ..? झोपलेल्यास उठविता येत परंतु कुंभकर्णी झोपेच सोंग घेतलेल्या सरकारला जागवण आता अशक्यच वाटू लागले .

      कांदा उत्पादक प्रचंड अडचणीत सापडलेला असताना त्याच्या दुःखावर फुंकर मारणार कुणीही नाही, ठोस निर्णय घेतला जात नाही..कृषीप्रधान देशात कृषकाचीच अशी दुरावस्था ही मोठी शोकांतीकाच म्हणावी लागेल.


मी ३३. ४० किलो चांगल्या प्रतीचा कांदा विकला फक्त ३९०/-रु. क्विंटल दराने मला हमाली काढून रुपये मिळाले  १२६७४/ त्यातून गाडीभाडे ४०००, कांदे काढणे मजूरी ३५००, लागवडीसाठी ३०००, खत, नांगरणी, निंदणी, फवारणी इ. साठी ९५००.  ४ महिने मी व माझे कुटूंबीय राबले ती मजुरी तर हिशेबातच नाही..आलेल्या पैशातून नफा व मजूरी तर सोडा पण टाकलेल्या भांडवलाचा निम्मे खर्चही निघाला नाही. खरंच आता या कर्जाच्या ओझ्याखाली दबत चाललेल्या आमच्यासारख्या शेतकऱ्यांना कुणीच वाली नाही. म्हणून खूपच वाईट वाटत.
      गेल्या ३/४ वर्षापासून सतत दुष्काळ  पडतो.  शेती मालाचे उत्पादन निम्मे झाले , तर खर्च चौपट झाला  भाव मात्र घटतोय पण वाढत नाही, पाणी नाही, कसेबसे पिकल तर विकल जात नाही.. मग शेतकरी जगेल तरी कसा ?  त्याला सर्व पर्याय संपतात म्हणून हताशपणे  चुकीचे मार्ग पत्करतो...
         गौरव वाघ - एक शेतकरी