जिल्हा ग्रंथोत्सव 20 व 21 डिसेंबर रोजी

ग्रंथोत्सवात तीन परिसंवाद व कवी संमेलन

नागपूर दि.18 : ग्रंथ हेच गुरू या शब्दानुसार जिल्हयातील साहित्यीक वाचक यांच्यासाठी पर्वणी असणारा जिल्हा ग्रंथोत्सव 20 व 21 डिसेंबर रोजी वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेत आयोजित करण्यात आला आहे.
ग्रंथालय संचालनालय,व जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या विदयमाने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवामध्ये ग्रंथ प्रदर्शन व विक्री देखील करण्यात येईल. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन गुरुवार दि. 20 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता ग्रंथ पूजन व ग्रंथ दिंडीने होईल. सेवा सदन हायस्कूलपासून झाशी राणी चौक मार्गे संविधान चौकात ग्रंथ दिंडी जाईल. ग्रंथोत्सवच्या उद्घाटक म्हणून सेवा सदन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा कांचनताई गडकरी राहतील. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व शिक्षणाधिकारी एस.एन.पटवे राहतील.
ग्रंथ दिंडी व ग्रंथ पुजनानंतर सकाळी 11 वाजता उद्घाटन होईल. उद्घाटक म्हणून महापौर नंदाताई जिचकार तर अध्यक्ष म्हणून वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. सुनेत्रा माहजन (पाटील) राहतील. या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय, ग्रंथालय संचालक सु.ही.राठोड, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष अनिल बोरगंवार, सहाय्यक ग्रंथालय संचालक श्रीमती मिनाक्षी कांबळे असतील. दुपारी 1 वाजता ‘ग्रंथाने मला काय दिले’ या विषयावर परिसंवाद आहे. प्रा. शिशीर वर्मा अध्यक्ष असलेल्या या परिसंवादात डॉ.प्रदीप आगलावे व स्तंभ व नाट्य लेखक दिनकर बेडेकर सहभागी होतील. या परिसंवादानंतर सायंकाळी 4.30 ते 6 या दरम्यान पोळी जरा जपून या समाज प्रबोधनात्मक काव्यमय कार्यक्रमाचे सादरीकरण होईल. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी प्रा.डॉ.रजनी तोंडचीरकर-हुद्दा असतील. तर प्रसिद्ध कवियत्री व लेखिका प्रा. विजया मारोतकर या कार्यक्रमाचे सादरीकरण करतील.
दुसऱ्या दिवशी 21 डिसेंबर रोजी ‘21 व्या शतकातील आव्हाने आणि गांधी विचाराची आवश्यकता’ हा परिसंवाद होईल. या परिसंवादाचे अध्यक्ष राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, तर प्रमुख वक्ते म्हणून (पश्चिम विभाग) कोलकाता रा.रा.रॉ.ग्रंथालयाचे क्षेत्रिय अधिकारी अनंत व्ही. वाघ, नई तालीम समिती, सेवाग्राम आश्रम, वर्धेचे पूर्व मंत्री अनिल फरसोले, नागपूरच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या सहाय्यक संचालक श्रीमती शैलजा वाघ-दांदळे उपस्थित राहतील. दुपारी 2.30 ते 4 दरम्यान ‘स्पर्धा परीक्षांना सामोर कसे जावे ?’ या विषयावर परिसंवाद आहे. यामध्ये आय.ए.एस. ॲकेडमी, नागपूरचे संचालक डॉ.प्रमोद लाखे राहतील. प्रमुख वक्ते म्हणून कॉर्पोरेट ट्रेनर डॉ. सुमंत टेकाडे व मोटीव्हेशनल स्पीकर पवन यादव राहतील. दुपारी 4.15 ते 5.45 दरम्यान कवी संमेलन : (काव्यफुलोर) होईल. यामध्ये प्रा.विजया मारोतकर, श्री. मंगेश बावसे, डॉ.विशाखा कांबळे, डॉ. रजनी तोंडवीरकर-हुद्दा, डॉ.शेखर विसपुते, डॉ. माया वंजारे, डॉ. लिहितकर, प्रा. वसंत पवार, श्रीमती मंदा पाटील, विशाल देवतळे, आदित्य देशकर, नीता खोत, किरण पिंपळशेंडे, चारुदत्त अघोर, मृगा पागे इत्यादी कवी व कवयित्री सहभागी होतील. सायंकाळी 6 ते 7 दरम्यान ग्रंथोत्सवाचा समारोप असून रंगकर्मी अनिल चनाखेकर हे अध्यक्ष असून प्रमुख अतिथी म्हणून वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेचे ग्रंथपाल प्रा.डॉ.सुनिल पुनवटकर, समिक्षक किशोर भांदककर उपस्थित राहतील. तरी या ग्रंथोत्सवाला विद्यार्थी-विद्यार्थिनी, वाचक, नागरिक, माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा ग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष अश्विन मुदगल यांनी केले आहे.