महानिर्मितीच्या राज्यस्तरीय बाह्यगृह क्रीडास्पर्धेचे चंद्रपूर येथे शानदार उद्घाटन

उर्जानगर (चंद्रपूर) :
  महानिर्मिती क्रीडास्पर्धेच्या माध्यमातून सुसंवाद, प्रत्यक्ष भेटीगाठी, शारीरिक सुदृढता वृद्धींगत होते तसेच वीज उत्पादनासाठी सकारात्मक उर्जेची वर्षभराची पुंजी निर्माण होत असल्याचे प्रतीपादन  महानिर्मितीचे कार्यकारी संचालक कैलाश चिरूटकर यांनी केले. ते क्रीडास्पर्धेचे उद्घाटक म्हणून ऊर्जानगरात बोलत होते.

ऊर्जानिर्मिती क्षेत्रात अविरत कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी शारीरिकदृष्ट्या सुदृढ राहावेत तसेच त्यांच्या क्रीडागुणांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने महानिर्मिती कंपनीच्या तीन दिवसीय आंतर विद्युत निर्मिती केंद्र बाह्यगृह क्रीडास्पर्धेचे विलोभनीय उद्घाटन ऊर्जानगर  येथील खुले रंगमंच मैदान येथे कैलाश चिरूटकर कार्यकारी संचालक यांचे शुभहस्ते झाले.

याप्रसंगी अध्यक्षस्थानी जयंत बोबडे मु
ख्य अभियंता, अनिल मुसळे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, उप मुख्य अभियंते राजेश राजगडकर, अनिल आष्टीकर, राजेशकुमार ओसवाल, मधुकर परचाके, उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम, पुरुषोत्तम वारजूरकर, सी.आय. एस.एफ. चे विवेक सिंग प्रामुख्याने उपस्थित होते. 

मोरेश्वर मडावी  आणि चमूने सादर केलेल्या सुमधुर स्वागतगीतानंतर सर्व खेळाडूंनी संगीताच्या तालावर मान्यवरांना मानवंदना दिली व कैलाश चिरूटकर यांनी ध्वजारोहण करून क्रीडास्पर्धेचे उद्घाटन झाल्याची घोषणा केली. याप्रसंगी आकाशात तिरंगी फुगे सोडण्यात आले. प्रारंभी चंद्रपूरच्या नामांकित खेळाडूंनी क्रीडाज्योत आणली. चंद्रपूर वीज केंद्राचे ज्येष्ठ खेळाडू अभय मस्के यांनी सर्व खेळाडूना शपथ दिली. तीन दिवसीय क्रीडास्पर्धेविषयीची माहिती अनिल मुसळे यांनी दिली व राष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली व खेळाडूना शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय भाषणातून जयंत बोबडे म्हणाले कि, क्रीडास्पर्धेच्या माध्यमातून क्रीडा नैपुण्य वाढीस लागते, निकोप स्पर्धा निर्माण होते. एकत्रित येण्याने संघटीत शक्ती निर्माण होते व हिच महानिर्मितीची विशेषता आहे. उद्घाटन समारंभाचे सूत्र संचालन आनंद वाघमारे व पुरुषोत्तम वारजूरकर यांनी तर आभार प्रदर्शन आनंद वाघमारे यांनी केले.  

उद्घाटन समारंभाला अधीक्षक अभियंते, विभाग प्रमुख, कल्याण अधिकारी, सहाय्यक कल्याण अधिकारी, अभियंते-तंत्रज्ञ, संघटना प्रतिनिधी, पत्रकार मंडळी, नागरिक तसेच अकरा संघांचे सुमारे ६५० खेळाडू उपस्थित होते.