ऐतिहासिक पेडगाव किल्यावर शंभुसेना संघटनेच्या वतीने वृक्ष संवर्धन मोहीम..




ऐतिहासिक पेडगाव किल्यावर शंभुसेना संघटनेच्या वतीने वृक्ष संवर्धन मोहीम..

*जारने पाणी देण्याची आगळी-वेगळी अभिनव संकल्पना..*

वृक्ष संवर्धनाचे शंभुसूत्र...एक शंभुभक्त...एक झाड...एक जार..

अ.नगर (प्रतिनिधी) : उन्हाळ्याची तीव्र दाहकता व सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे पेडगाव येथील किल्ले धर्मवीरगडावरील (बहादूरगड) वृक्षांच्या संवर्धनाची गरज लक्षात घेऊन, प्रत्येक झाडास एक जार म्हणजेच कमीत-कमी २० लिटर पाणी देत, शंभुसेना संघटनेच्या वतीने झाडांना जारच्या माध्यमातून पाणी घालुन वृक्ष संर्वधन करण्याची आगळी-वेगळी अभिनव संकल्पना राबविण्यात आली.

शिवपुत्र व स्वराज्याचे धाकले धनी, धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या तेजस्वी शौर्यचा कणखर बाणेदार इतिहासाचा साक्षीदार असलेल्या पेडगाव येथील किल्ले धर्मवीरगडावर (बहादूरगड) विविध माध्यमांद्वारे दरवर्षी वृक्षांची लागवड केली जाते व त्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जातो, तरी देखील उन्हाळ्यात सर्व झाडांचे संवर्धन करणे खूपच जिकिरीचे होते, यामुळे सर्व माध्यमे आप-आपल्या परीने संवर्धनाचे प्रयत्न करत असतात. याचाच एक भाग म्हणून शंभुसेना सामाजिक संघटनेच्या वतीने ऐन उन्हाळ्यासह लॉकडाऊन काळात मोहिमेतील संबंधित शंभुभक्तांनी संचारबंदीत सुरक्षित अंतर ठेवून वृक्ष संवर्धन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

पेडगाव किल्ल्यावरील वृक्ष संवर्धन मोहिमे प्रसंगी झाडांभोवतालचे गवत काढुन, झाडांना आळी करत, प्रति झाडाला एक जार म्हणचे २० लिटर पाणी घालुन वृक्ष संवर्धन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यात शंभुसेना संघटना प्रमुख मा. दिपक राजेशिर्के, प्रा.शिवाजी क्षिरसागर सर, लक्ष्मीकांत राजेशिर्के सर, श्यामकुमार काराळे सर, वारकरी हरीभक्त परशुराम खळदकर, नवनाथ क्षिरसागर तसेच तेजस काराळे , प्रणव क्षिरसागर आदी सहभागी झाले होते.याप्रसंगी बोलताना राजेशिर्के यांनी राज्यातील शंभुसेना पदाधिकाऱ्यांना उन्हाळ्यासह लॉकडाऊनची तीव्रता पाहता आपल्या भागातील पाण्याची गरज असलेल्या झाडांना पाणी घालून वृक्ष संवर्धन करण्याचे कळकळीचे आवाहन करत कोणतेही समाजकार्य करत असताना लॉकडाऊन व संचारबंदीच्या नियमाचे पालन करण्याचे आवाहनही केले आहे.