धक्कादायक.. आतापर्यंतच्या सर्वात जास्त बाधितांची जिल्ह्यात वाढ, 24 तासात 132 बाधितांची भर


धक्कादायक.. आतापर्यंतच्या सर्वात जास्त बाधितांची जिल्ह्यात वाढ, 24 तासात 132 बाधितांची भर

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1799 वर

आतापर्यत 1081 कोरोनातून बरे ;
696 बाधितांवर उपचार सुरू

24 तासात 132 बाधितांची नोंद ; दोन बाधितांचा मृत्यू

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर, दि.27 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील गेल्या 24 तासात कोवीड -19 संक्रमित 132 बाधित आढळून आल्याने आत्तापर्यंत कोवीड संक्रमित झालेल्या बाधितांची संख्या 1799 झाली आहे. आतापर्यंत 1081 बाधित कोरोनामुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या 696 बाधित उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात दोन मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये मौलाना आझाद वार्ड बल्लारपूर येथील 52 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला श्वसनाचा व अस्थमाचा त्रास तसेच न्युमोनिया असल्याने दिनांक 24 ऑगस्टला ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे उपचारासाठी भरती करण्यात आले. 26 ऑगस्टला सकाळी 5:30 वाजता अँन्टीजेन चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आला होता. पुढिल उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. बाधिताला कोरोनासह श्वसनाचा, अस्थमाचा त्रास तसेच उच्चरक्तदाब, न्युमोनिया असल्याने 26 ऑगस्टला सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला.

आज 27 ऑगस्टच्या पहाटे दिड वाजता 60 वर्षीय पठाणपुरा वॉर्ड चंद्रपूर येथील बाधित पुरूषाचा मृत्यू झाला आहे. कोविड केअर सेंटर वन अकादमी येथून 25 ऑगस्टला दुपारी 3 वाजता श्वसनाचा त्रास असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले. वैद्यकीय शर्तीचे प्रयत्न करूनही 27 ऑगस्टच्या पहाटे दीड वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे बाधिताचा मृत्यू झाला.या बाधिताला न्युमोनिया तसेच श्वसनाचा व मधुमेहाचा आजार होता.आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात 22 मृत्यू झाले असून चंद्रपूर जिल्ह्यातील 19 तर तीन मृत्यू जिल्ह्याबाहेरील आहे.

24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील सर्वाधिक 55 बाधित पुढे आलेले आहेत. त्याचबरोबर बल्लारपूर 2, मुल 18, ब्रह्मपुरी 5, वरोरा व राजुरा येथील प्रत्येकी 8, सावली 20, कोरपना 11, भद्रावती चार तर गोंडपिपरी येथील एक बाधीत ठरला असून असे एकुण 132 बाधितांचा समावेश आहे.

चंद्रपूर शहरातील रामाळा तलाव, विठ्ठल मंदिर वार्ड, डॉ.आंबेडकर नगर, स्नेह नगर, रयतवारी, छत्रपती नगर, वडगाव रोड, जटपुरा वार्ड, तुकूम, आनंदनगर, गंजवार्ड, डब्ल्यूसीएल कॉलनी परिसर, भानापेठ, बाबुपेठ, महेश नगर, दादमहाल वार्ड, पंचशिल वार्ड,पठानपुरा वार्ड, बेलेवाडी, संध्या नगर तर तालुक्यातील घुग्घुस, दुर्गापुर भागातील बाधित पुढे आले आहेत.

बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथील बाधित ठरले आहे. मुल तालुक्यातील केळझर व चिंचाळा भागातून बाधित पुढे आले आहेत. ब्रह्मपुरी येथील संत रविदास चौक तर तालुक्यातील उदापूर गावातून बाधित ठरले आहेत. वरोरा येथील सिद्धार्थ वार्ड तर तालुक्यातील शेगाव, वनोजा, नागरी, शेंबळ, बोर्डा या गावातून बाधित पुढे आले आहेत.

राजुरा येथील आझाद चौक, रामनगर, कर्नल चौक येथील बाधित ठरले आहेत. सावली तालुक्यातील पालेबार्सा, पाथरी, सामदा, व्याहाड बु गावातील पॉझिटिव पुढे आले आहे. कोरपना तालुक्यातील वनसडी या गावातून तर गडचांदूर येथील बाधित ठरले आहेत.

भद्रावती येथील एकता नगर तर तालुक्यातील माजरी गावातील बाधित ठरले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील किरिमिरी गावातून बाधित पुढे आला आहे.

वयोगटानुसार कोरोना बाधितांची संख्या:

जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1799 झाली आहे. यापैकी 0 ते 5 वर्षे वयोगटातील 34 बाधित, 6 ते 18 वर्ष वयोगटातील 157 बाधित, 19 ते 40 वर्षे वयोगटातील 184 बाधित, 41 ते 60 वर्षे वयोगटातील 475 बाधित, 61 वर्षावरील 119 बाधित आहेत. तसेच 1799 बाधितांपैकी 1206 पुरुष तर 593 बाधित महिला आहे.

राज्याबाहेरील, जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या:

1799 बाधितांपैकी जिल्ह्यातील 1689 बाधित असून जिल्ह्याबाहेरील 47 बाधित आहेत. तर राज्याबाहेरील बाधितांची संख्या 63 आहे.

जिल्ह्यातील अलगीकरण विषयक माहिती:

जिल्ह्यात एकूण संस्थात्मक अलगीकरणात 1 हजार 88 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 62 नागरिक, तालुकास्तरावर 379 नागरिक तर, जिल्हास्तरावर 647 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 94 हजार 738 नागरिक दाखल झाले आहेत. 93 हजार 378 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. 1 हजार 360 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.

00000