नवीन वर्षापासून महावितरणचे 'प्रीपेड स्मार्ट मीटर '





नवीन वर्षापासून महावितरणचे 'प्रीपेड स्मार्ट मीटर

वीजग्राहक मोबाइल दूरध्वनीप्रमाणे.....

दिनचर्या विशेष प्रतिनिधी

मुंबई :
महावितरणच्या सर्व ग्राहकांचे सध्याचे पारंपरिक मीटर बदलण्यात येणार असून त्याऐवजी प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येतील. सध्याच्या पद्धतीत वीजग्राहकांनी वीज वापरल्यानंतर दरमहा त्यांच्या मीटरचे रीडिंग घेतले जाते व त्यानुसार बिल पाठविले जाते. एखाद्या ग्राहकाने
नेहमीपेक्षा जास्त वीज वापरली तर मोठे बिल येते व त्यामुळे ग्राहकाचे आर्थिक नियोजन बिघडते. वीज वापरली असल्याने त्याचे बिल भरण्याशिवाय पर्याय नसतो. स्मार्ट मीटर बसविल्यावर वीजग्राहक मोबाइल दूरध्वनीप्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरतील.

महावितरणच्या ग्राहकांना वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर राज्यभर बसविण्याची तयारी सुरू झाली असून नवीन वर्षात जानेवारीपासून टप्प्याटप्याने हे मीटर मोफत बसविले जातील. महावितरणच्या दोन कोटी ४१ लाख ग्राहकांकरिता हे मीटर बसविण्यासाठी दोन वर्षांहून अधिक काळ लागणार आहे.
उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीजग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमुख सेवा देण्याची सूचना किली आहे. त्यानुसार ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रणाचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचे महत्त्वाचे पाऊल महावितरणने उचलले आहे.

अचानक वीज खंडित होणार नाही

प्रीपेड स्मार्ट मीटरमध्ये ग्राहकाने भरलेले पैसे संपले की वीजपुरवठा खंडित होईल. पण ग्राहकांना त्यांच्या मोबाइलवर वीजवापर आधीच माहिती झाल्यामुळे आणि किती पैसे उरले आहेत, हेसुद्धा माहिती असल्यामुळे नव्याने पैसे भरणे सुलभ होईल. घरबसल्या मोबाइलवरून ऑनलाइन पैसे भरण्याचीही सुविधा आहे. ग्राहकाचे पैसे संपत आल्यावर त्याला मोबाइलवर संदेश पाठविला जाईल. एखाद्या ग्राहकाने विजेसाठी भरलेले पैसे मध्यरात्री संपले, तर अचानक रात्री वीजपुरवठा बंद होणार नाही. सायंकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत पैसे संपले तरी वीजपुरवठा चालू राहील. संबंधित ग्राहकाने दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत पैसे भरून वीजपुरवठा चालू ठेवायचा व त्यामधून पैसे संपल्यानंतर वापरलेल्या विजेचे पैसे वजा होतील, अशी सुविधा या मीटरमध्ये केलेली आहे.